विठ्ठलराव पाटील हे महाराष्ट्रातील महापुरुष होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST2021-08-24T04:33:06+5:302021-08-24T04:33:06+5:30
देवरी : भारत देश हा दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर आधुनिकीकरणास सुरुवात झाली. स्वातंत्र्य चळवळीत असंख्य देशभक्त महापुरुष ...

विठ्ठलराव पाटील हे महाराष्ट्रातील महापुरुष होते
देवरी : भारत देश हा दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर आधुनिकीकरणास सुरुवात झाली. स्वातंत्र्य चळवळीत असंख्य देशभक्त महापुरुष होऊन गेले. त्यामध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आधुनिक महाराष्ट्राला प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रातील फार मोठे महापुरुष होते, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी जी. जी. तोडसाम यांनी केले.
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार आयोजित पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून चिचगडचे मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, देवरीचे मंडळ कृषी अधिकारी विकास कुंभारे उपस्थित होते. तोडसाम म्हणाले, डॉ. विखे पाटील यांनी १९४९ ला सहकारी तत्त्वावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करून कृषिक्षेत्र व सहकार चळवळीत मोठा इतिहास घडविला. त्यामुळे आज उसाची व्यापारी तत्त्वावर लागवड सुरू झाली. त्या जोरावर आज महाराष्ट्रात १६५ सहकारी साखर कारखाने उदयास आले. त्यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी कामगारांची अर्थव्यवस्था सुधारलेली आहे. अशा या महापुरुषाच्या भरीव कार्याचे स्मरण होऊन आधुनिक तरुण शेतकरी बांधवांना स्फूर्ती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी नारळी पौर्णिमा या त्यांच्या जन्मदिनानिमित्त शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात येत असल्याचे सांगितले. कृषी सहायक राजेश भोयर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.