लसीकरणाचे कामकाज नवख्यांच्या हाती
By Admin | Updated: July 6, 2014 23:59 IST2014-07-06T23:59:09+5:302014-07-06T23:59:09+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या मेंदूज्वर लसीकरण मोहेम राबविली जात आहे. १ ते १५ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांसाठी असलेल्या लसीकरणाचे कामकाज मात्र नवख्यांच्या हाती दिसून आले.

लसीकरणाचे कामकाज नवख्यांच्या हाती
माहितीअभावी पालकांची धावपळ : उघड्यावरच सुरू होते लसीकरण
गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या मेंदूज्वर लसीकरण मोहेम राबविली जात आहे. १ ते १५ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांसाठी असलेल्या लसीकरणाचे कामकाज मात्र नवख्यांच्या हाती दिसून आले. शहरातील धोटे सूतिकागृहात तर उघड्यावरच लसीकरण केले जात होते. शिवाय प्रचार व प्रसिद्धीअभावी पालकांची धावपळसुद्धा दिसून आली.
मेंदूज्वर हा गंभीर आजार आहे. यापासून चिमुकल्यांची सुरक्षा व्हावी या दृष्टीने सध्या लसीकरणाची विशेष मोहीम राबविली जात आहे. यांतर्गत शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. याशिवाय कधीपासून तर कधीपर्यंत, कोठे, कालावधी याबाबत जनतेला माहितीच नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या लसीकरणाची व्यापक प्रचार व प्रसिद्धीच करण्यात आली नसल्याचे दिसते. शिवाय सदर प्रतिनिधीने शनिवारी शहरातील धोटे सूतिकागृहात जाऊन पाहिले असता तेथे अंगणात उघड्यावरच लसीकरणाचे काम सुरू असल्याचे दिसले. यात दोन मुली लसीकरणासाठी आलेल्यांचे कार्ड भरत होत्या. त्यातही त्यांना धड नावसुद्धा लिहिता येत नसल्याचे दिसले. तर लस लावण्यात येणाऱ्या चिमुकल्यांची पूर्ण माहितीसुद्धा त्यांनी विचारून भरली नसल्याचे आढळले. फक्त आई-वडिलांचे नाव व पत्ता लिहून कार्ड भरले जात होते. शिवाय लस लावणारी एक मुलगी व एक महिला दिसून आली. त्यांनाही पटापट लस लावून आपले काम आटोपण्याची घाई दिसून आली. त्यांना विचारणा केली असता, शनिवार हा शेवटचा दिवस असल्याचे कळले.
मेंदुज्वरसारख्या जीवघेण्या आजारावरील लसीकरणाचा कार्यक्रम असताना एखादे होर्डिंग किंवा पत्रक दिसून न आल्याने लसीकरणाची मोहीम ज्या लोकांना माहिती पडली फक्त तेवढ्यांपुरतीच होती असा भास होतो. शाळेत जाऊन लसीकरण केले जात असल्याचे ऐकायला आले. मात्र जी मुले शाळेत जात नाहीत त्यांचे काय, असा सवाल मात्र आता नागरिक करीत आहेत.
शिवाय एवढा मोठा व महत्त्वपूर्ण कार्यक्रम शासन राबवीत असला तरी जिल्हा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे सर्वसामान्य जनता मात्र त्यापासून वंचित राहणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. याकडे मात्र लोकप्रतिनिधी व नागरिकांंचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)