तुकडोजी महाराज पुण्यतिथी व वर्षावासाची सांगता
By Admin | Updated: November 2, 2015 01:29 IST2015-11-02T01:29:07+5:302015-11-02T01:29:07+5:30
शांतिनिकेतन गुरुकूल व गिरिजा ग्रंथालय पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ नगाजी महाराज ...

तुकडोजी महाराज पुण्यतिथी व वर्षावासाची सांगता
विविध धार्मिक कार्यक्रम : हजारोंच्या संख्येत उपासक-उपासिकांची उपस्थिती
बोंडगावदेवी : शांतिनिकेतन गुरुकूल व गिरिजा ग्रंथालय पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ नगाजी महाराज व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
पिंपळगाव येथील विठाई प्रतिष्ठान येथे पुण्यतिथी समारोहप्रसंगी विशेष भक्ती मार्गदर्शक म्हणून हभप उरकुडे महाराज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य रमेश डोंगरे होते. या वेळी टी.सी. सौंदरकर, सरपंच गोपाल परशुरामकर, धाडू परशुरामकर, डॉ. रामदास परशुरामकर, उपसरपंच समेद लाडे, कृष्णा परशुरामकर, बाळकृष्ण फुलबांधे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम संतश्रेष्ठ नगाजी महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्ज्वलन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करताना मान्यवर म्हणाले, संतांचे विचार समाजाला प्रेरणादायी ठरणारे आहेत. अव्याहतपणे समाजाला जागृत करून राष्ट्रभिमान जागविण्याचे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केले.
कार्यक्रमासाठी बळीराम उरकुडे, शांता उरकुडे, मोहन उरकुडे, खुशाल उरकुडे यांनी सहकार्य केले.
वर्षावासाची सांगता
बोंडगावदेवी : निसर्गरम्य स्थळी असलेल्या काळीमाटी येथील बुद्ध विहारात वर्षावासाची सांगता झाली. याप्रसंगी परिसरातील बौद्ध उपासकांनी हजारोंच्या संख्येत उपस्थिती दर्शवून तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलन करून पंचाग प्रणाम केले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव मार्गावरील तसेच स्मृतिशेष भदंत प्रज्ञाज्योती थेरो यांच्या वास्तव्याने श्रद्धेचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या काळीमाटी येथील बुद्ध विहारात (दि.३०) वर्षावास सांगता कार्यक्रम घेण्यात आला. वर्षावास समाप्ती सभारंभाला पूज्य भिक्खू दर्शनदीप थेरो, भिक्खू सुगतानंद थेरो, भिक्खू आनंद, श्रामणेर विनयज्योती धम्मोपदेशक म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या हजारो बौद्ध उपासक-उपासिकांनी त्रिशरण ग्रहण करून भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर पंचाग प्रणाम करून वंदन केले. आयोजकांच्या वतीने भिक्खू संघाला चिवरदान व भोजनदान दिल्यानंतर उपस्थितांनीसुद्धा लाभ घेतला.
तथागतांच्या पंचशील, आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब दैनंदिन जीवनात करावा, असा धम्मोपदेश भिक्खू संघाने दिला. तसेच बुद्धाची शिकवण उत्तम व संस्कारित जीवन जगण्यासाठी पर्याप्त असल्याचे मार्गदर्शन केले.
वर्षावास समाप्ती सभारंभासाठी परिसरातील बौद्ध उपासकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)