हलबीटोल्यातील तणाव निवळला
By Admin | Updated: May 14, 2016 01:46 IST2016-05-14T01:43:28+5:302016-05-14T01:46:24+5:30
धार्मिक स्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या सालेकसानजीकच्या हलबीटोला या गावाला दलित विरूद्ध इतर सर्व गावकरी असा समाज विभाजीत करून

हलबीटोल्यातील तणाव निवळला
सालेकसा : धार्मिक स्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या सालेकसानजीकच्या हलबीटोला या गावाला दलित विरूद्ध इतर सर्व गावकरी असा समाज विभाजीत करून जातीय सलोखा भंग करण्याचा प्रयत्न काही समाजकटंक लोक करीत होते. परंतु तहसीलदार प्रशांत सांगळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी औटी यांच्या स्वयं तत्परतेमुळे गावात तनावाचे वातावरण होत असताना सर्वत्र शांतता व जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व गावकरी एकतेने राहण्यासाठी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून काही लोक गावात जातीभेद निर्माण करून आपला हेतू साधण्याचा प्रयत्न करीत होते. १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दलित बांधवांनी शाळेच्या परिसरात पंचशील ध्वज उभारून आपला कार्यक्रम घेतला. यावेळी सालेकसा वरून बाबासाहेबाचे अनुयायी रॅलीसह त्या ठिकाणी हजर झाले होते. त्या कार्यक्रमानंतर काही लोकांनी ते ध्वज हटविण्यासाठी अप्रत्यक्ष दलित समाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात कोणी सामोर येऊ शकले नाही. चार-पाच दिवसांपूर्वी त्या लोकांनी दलित समाजाला गावातील इतर समाजापासून दूर ठेवून बहिष्कृत करण्याचा डाव मांडला. एवढेच नाहीतर सामाजिक, मांगलिक कार्यक्रमात दलितांना दूर ठेवावे असाही डाव रचला, परंतु याला गावातील अनेक समजदार लोकांचा विरोध होता. दरम्यान १२ मे च्या रात्री अज्ञात लोकांनी पंचशील ध्वज काढून टाकला. त्यामुळे लगेच सकाळी दलित बांधवांनी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला व काही लोकांच्या विरोधात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इतर सर्व गावकरीसुद्धा पोलीसात जाण्यासाठी निघाले. यातून तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली. काहीसमाज कटंक व विकृत बुद्धीचे लोक गावात जातीभेद निर्माण करून आपले हित साधण्यासाठी गावातील शांतता व सलोखा भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब लक्षात येताच तहसीलदार सांगळे, ठाणेदार औटी, दलित नेते खेमराज साखरे व गावातील समजदार लोकांनी प्रकरण मिटविण्याचा दिशेने प्रयत्न केला. शेवटी सर्वानी माघार घेतली आणि गाव शांत झाले. ‘त्या’ जागेची परवानगी घेतली नव्हती १४ एप्रिल रोजी ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्याला गावकºयांची सहमती होती. त्या कार्यक्रमाला इतरही समाजबांधव हजर होते. परंतु कार्यक्रमानंतर पंचशील ध्वज काढण्यात आला नाही. तर ठिकाणी डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल अशी चर्चा गावात होती. त्यामुळे काही लोक विरोध करू लागले होते. शासकीय जागेवर पुतळा उभारण्यापूर्वी शासनाची परवानगी घेऊन अटींची पूर्तता करावी लागते. परंतु पंचशील ध्वज उभारण्यापूर्वी किंवा नंतर परवानगी घेण्यात आली नव्हती. ही बाब दलित बांधवांच्या ध्यानात आणून अधिकाºयांनी समजून घातली.