आरोग्य सेविकांना टोलवाटोलवी
By Admin | Updated: June 8, 2014 00:02 IST2014-06-08T00:02:28+5:302014-06-08T00:02:28+5:30
कामावर असलेल्या संपूर्ण २८0 आरोग्य सेविकांच्या कामांचे मुल्यमापन करण्याचे खुले आव्हान देत ४४ आरोग्य सेविकांनी धरणे आंदोलन सुरू आहे. रखरखत्या उन्हात त्या आपल्या हक्कासाठी मैदानात उतरल्या असून

आरोग्य सेविकांना टोलवाटोलवी
गोंदिया : कामावर असलेल्या संपूर्ण २८0 आरोग्य सेविकांच्या कामांचे मुल्यमापन करण्याचे खुले आव्हान देत ४४ आरोग्य सेविकांनी धरणे आंदोलन सुरू आहे. रखरखत्या उन्हात त्या आपल्या हक्कासाठी मैदानात उतरल्या असून २ जून पासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान त्यांनी अधिकार्यांची भेट घेऊन पुनर्नियुक्तीची मागणी केली. मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी त्यांची टोलवा-टोलवी करीत असल्याचे या आरोग्य सेविकांचे म्हणणे आहे. यामुळेच आता सोमवारपासून (दि.९) या ४४ आरोग्य सेविका साखळी उपोषण सुरू करणार आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्य सेविकांची २३६ पदे मंजूर आहेत. परंतु आरोग्य विभागात २८0 कंत्राटी आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पीआयपी अंतर्गत मंजूर २३६ तर कंत्राटी ४४ आरोग्य सेविकांच्या संख्येवरून नेहमीच काही ना काही वाद निर्माण होतो. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. भिमराव मेश्राम यांनी आपल्या कार्यकाळात अधिकच्या आरोग्य सेविकांना नियुक्ती दिल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यामुळे मात्र जुन्या आरोग्य सेविका अडचणीत आल्या आहेत. परिणामी जिल्हा परिषदेने ९६ आरोग्य सेविकांना सेवेतून कमी केले होते. यावर मात्र आरोग्य सेविकांच्या आंदोलना नंतर ४४ आरोग्य सेविकांना पुन्हा कामावर घेण्यात आले. मात्र आता त्यांनाही मार्च नंतर पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नसल्याने त्या अधांतरीच आहेत.
पुनर्नियुक्ती द्यावी या मागणीसाठी या ४४ आरोग्य सेविकांचे २ जून पासून धरणे आंदोलन सुरू आहे. आपल्या आंदोलनांतर्गत त्यांनी २८0 आरोग्य सेविकांचे मुल्यमापन करण्याचे जिल्हा परिषदेला म्हटले. तर त्यानंतरही एक आशा बाळगून त्या अधिकार्यांना भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अधिकारी या आरोग्य सेविकांना यांच्याकडे-त्यांच्याकडे पाठवून त्यांची टोलवा-टोलवी करीत आहेत.
एवढेच नव्हे तर आंदोलनावर बसलेल्या या आरोग्य सेविकांना अपमानास्पद वागणुकीचा सामनासुद्धा करावा लागत असल्याचे या आरोग्य सेविकांचे म्हणणे आहे. कुणाचा अधिकार न हिरावता कामांचे मुल्यमापन करवून घेण्याची तयारी या ४४ आरोग्य सेविकांनी दर्शविली आहे. मात्र अधिकारी त्यांचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अशात आता लढा सुरू झाला असून मधात सोडता येत नसल्याने आपल्या न्यायासाठी सोमवारपासून (दि.९) साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे आरोग्य सेविकांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)