तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST2021-08-24T04:32:59+5:302021-08-24T04:32:59+5:30
नरेश रहिले गोंदिया : वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक अधिनियमाच्या अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाते. जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकारी ...

तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना?
नरेश रहिले
गोंदिया : वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक अधिनियमाच्या अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाते. जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहनांना अडविण्याची गरजच आता राहिली नाही. सद्य:स्थितीत प्रत्येक वाहतूक पोलिसाच्या हातात ई-चालानकरिता मोबाईल देण्यात आला आहे. या मोबाईलमधील ॲपवर संबंधित वाहनाच्या क्रमाकांचे छायाचित्र काढले जाते. हे छायाचित्र काढताच त्या वाहन चालकाच्या मोबाईलवर दंडाचा एसएमएस जातो. परंतु, अनेक लोक आपले मोबाईल क्रमांक वारंवार बदलत असल्याने त्यामुळे त्या वाहनचालकाला आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आणि आपल्याला दंड ठोठावण्यात आला हेदेखील माहिती नसते. त्या वाहनावर हजारो रुपयांचा दंड जमा होऊन जातो. त्यामुळे त्या दंडाची वसुली कशी करणार हा प्रश्न आहे. गोंदिया जिल्ह्यात वाहतूक शाखेने ई-चालानद्वारे दंड ठोठावला जातो. परंतु, अनेक लोक दंड भरत नसल्याचे पुढे आले आहे. गोंदिया जिल्ह्यात ई-चालन झालेले ९५ टक्के लोक दंड भरतात हे मात्र खरे.
.........................
कसे फाडले जाते ई-चालान
१) जिल्हा वाहतूक शाखेकडे ई-चालानकरिता ॲप देण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचारी आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप डाऊनलोड करतात. रस्त्यावर ड्युटी करताना ज्या वाहन चालकाकडून नियम तोडले जातात, त्या वाहनाचे छायाचित्र काढून दंडाचा एसएमएस त्या वाहनचालकाच्या मोबाईलवर पाठविला जातो. त्यामुळे वाहनचालकांची गोची होत आहे.
..........
२) ई-चालानच्या मेसेजमध्ये संबंधित वाहन चालकाने नो पार्किंग, सिग्नल तोडणे, भरधाव वेगात गाडी चालविणे, ट्रीपल सीट अशा नियमांचा भंग केला हे त्यात नमूद केले जाते. दंडाची रक्कम किती हे सुद्धा त्या मेसेजमध्ये सांगण्यात येते. केलेला दंड वाहनचालक कुठेही भरू शकतात.
............................
मोबाईल अपडेट केला आहे काय?
- वाहन खरेदी करतानाच मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे आहे.
-परिवहन विभागाकडे आपल्या वाहनाच्या क्रमांकासाेबत मोबाईल क्रमांकही जोडला जातो.
- अनेकजण मोबाईल क्रमांक बदलतात. त्यामुळे समस्या येत आहे.
.....................
दंडाची थकबाकी वाढली
- जिल्हा वाहतूक शाखेकडून यापूर्वी नियम तोडल्यास लगेच त्या वाहन चालकाला पकडून त्याच्याकडून दंडाची रक्कम वसूल केली जात होती.
- आधीच्या प्रकारामुळे वाहन चालकांकडून वेळीच दंड वसूल होत होता.
-आता ई-चालानमुळे संबंधित वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करतात.
.............
सन---------- झालेला दंड------------------- वसूल दंड
२०१९-------- ८३२००००-------------------७९६४८००
२०२०-------- ८४२११५०-------------------७७३५५५०
२०२१ जुलै--- ३३१६६५०-------------------३१६७०५०
...........................
कोट
वाहतूक नियम मोडणाऱ्यांची गय केली जात नाही. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडे पैसे नसतील तर त्यांचा गाडी नंबर, कोणत्या कलमान्वये कारवाई केली, लोकेशन आणि त्याचे तडजोड शुल्क व नमूद असलेल्या मोबाईलवर मेसेज पाठविला जातो.
- दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया.