आदिवासी संस्कृती व परंपरेच्या जपणुकीसाठी काम करणार

By Admin | Updated: February 7, 2016 02:28 IST2016-02-07T02:28:29+5:302016-02-07T02:28:29+5:30

कचारगडचे महत्व केवळ आदिवासींचे एक धार्मिक स्थळ किंवा पर्यटकांसाठी कुतूहलाचे ठिकाण नाही तर आदिवासी संस्कृतीची ओळख आहे.

They will work for tribal culture and tradition | आदिवासी संस्कृती व परंपरेच्या जपणुकीसाठी काम करणार

आदिवासी संस्कृती व परंपरेच्या जपणुकीसाठी काम करणार

विजय मानकर सालेकसा
कचारगडचे महत्व केवळ आदिवासींचे एक धार्मिक स्थळ किंवा पर्यटकांसाठी कुतूहलाचे ठिकाण नाही तर आदिवासी संस्कृतीची ओळख आहे. शासनाच्या मदतीने येथील वनसंपत्ती, औषधीयुक्त वृक्ष, वन्यजीवांच्या संरक्षणासोबतच आदिवासी संस्कृती व परंपरेची जपणूक केली जाऊ शकते. त्यासाठी पुढाकार घेण्याची देवस्थान समितीची तयारी आहे. त्यासाठी कचारगड देवस्थानसह संपूर्ण ५५.२४ हेक्टरचा जंगल परिसर कचारगड देवस्थान समितीच्या स्वाधीन करावा, अशी अपेक्षा पारी कुपार लिंगो देवस्थान समिती कचारगडचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी व्यक्त केली.
कचारगड यात्रेची सुरूवात कशी झाली, केव्हापासून झाली याबद्दल विचारले असता कोकोडे म्हणाले, कचारगड देवस्थान हे संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान आहे. कचारगडच्या शोध आदिवासी संशोधक के.बा. मरस्कोल्हे यांनी १९८४ मध्ये लावला. त्यानंतर धर्माचार्य मोतीरावण कंगाली यांनी या ठिकाणी कचारगड यात्रेला सुरूवात केली. कचारगडचा उल्लेख १९०८ च्या भंडारा जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये पण असल्याची माहिती कोकोडे यांनी दिली.
१९८४ मध्ये काही मोजक्या लोकांनी यात्रेला व पूजेला सुरूवात केली. जसजसी माहिती मिळत गेली भाविक वाढत गेले. आज येथे जवळपास १४ राज्यांचे पाच लाखांपेक्षा जास्त भाविक माघ पौर्णिमेच्या यात्रेत येतात. आदिवासी समाजाच्या दृष्टीने या पुजेला मोठे महत्व असते. तिला बडादेव पूजा म्हणतात. गोंडी भाषेत याला ‘कोया पूनेम’ कार्यक्रम म्हणतात त्याला आता महोत्सवाचे स्वरूप आले आहे. देवाचे प्रतिक म्हणून त्रिशुलाची पूजा केली जाते. त्याला हळद तांदळाचा आडवा टिका उजवीकडून डावीकडे लावला जातो. पृथ्वीच्या फिरण्याचा नियमाच्या आधारे ते केले जाते. तसेच पूजेत मोहफुल आणि राड (धूप) हे पूजेचे साहित्य असतात. नारळाचा वापर होत नाही, हे या पुजेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसेंदिवस वाढत असलेली भाविकांची संख्या पाहता कोणत्या सोयी व्हाव्या, याबद्दल ते म्हणाले, भाविकांची संख्या व त्यांना होणारा त्रास पाहून शासनाने यंदा येथे छोट्या गुफेपर्यंत पक्के रस्ते बनविले ही चांगली बाब आहे. योसबत दोन भक्त निवास, एक सांस्कृतिक मंचसुद्धा आहे. परंतु ही सोय पुरेशी नाही. सर्वप्रथम दर्रेकसा रेल्वे स्टेशनवर यात्रेदरम्यान पाच दिवस सर्व एक्सप्रेस गाड्या थांबल्या पाहिजे. पाण्याची पुरेशी व्यवस्था, आरोग्य, निवास, फिरते शौचालय, पुरेशी विद्युत व्यवस्था इत्यादी व्यवस्थेकडे शासनाने लक्ष द्यावे, असे कोकोडे म्हणाले.
सर्वप्रथम शासनाने हा संपूर्ण परिसर समितीकडे सुपूर्द केला पाहिजे. यामुळे येथे एक बॉटनिकल गार्डन येथे लावता येईल. या गार्डनमध्ये औषधीयुक्त वनस्पतींचा समावेश असेल. यामुळे परिसरातील वृक्षांची कत्तल थांबविता येईल. तसेच वन्यजीव वाचविण्यातही मदत मिळेल.
या ठिकाणी शासनाच्या मदतीने वस्तुसंग्रहालय बनविण्याची गरज आहे. १७०० वर्षे राज्य करणाऱ्या आदिवासींचे शस्त्र, वेशभूषा, साहित्य, अलंकार, बाण इत्यादींची ओळख नवीन पिढीला होण्यासाठी आणि त्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी हे संग्रहालय उपयोगी ठरेल, असे कोकोडे म्हणाले. आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून दोन लाखांची मदत मिळते, परंतु येथे १५ ते २० लाखांचा खर्च असतो. लोक प्रतिनिधींनी शासनातून व स्वत:चा विकास निधी देवून पुरेशी व्यवस्था करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. कला संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रवेशद्वार व स्मारक बनविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Web Title: They will work for tribal culture and tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.