जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावे
By Admin | Updated: April 24, 2016 01:51 IST2016-04-24T01:51:47+5:302016-04-24T01:51:47+5:30
३५ वर्षापूर्वी एखाद्या बाईने कीर्तन, प्रवचन करावे ही नवलाईची गोष्ट होती. मला या भक्तीमार्गाची गोडी होती म्हणून मी याकडे वळले.

जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावे
उर्मिलाताई : ३५ वर्षांपासून जनजागृती
गोंदिया : ३५ वर्षापूर्वी एखाद्या बाईने कीर्तन, प्रवचन करावे ही नवलाईची गोष्ट होती. मला या भक्तीमार्गाची गोडी होती म्हणून मी याकडे वळले. आज अनेक महिला या क्षेत्रात आहेत. कीर्तनकार माणसंही भरपूर आहेत. पण खऱ्या अर्थाने यातून प्रबोधन करायचे असेल तर स्वत:चे आचरण आधी चांगले ठेवावे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने सर्वजण याची काळजी घेत नाहीत, अशी खंत उर्मिलाताई कारेमोरे यांनी व्यक्त केली.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पहिल्या महिला कीर्तनकार ठरलेल्या उर्मिलाईंनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक पैलू उलगडले. वयाच्या अठराव्या वर्षापासून कीर्तन-प्रवचनाकडे त्या वगळ्या. महिलांनी कीर्तन वगैरे करण्याची परंपरा नसलेल्या काळात संसार थाटण्याकडे पाठ फिरवून कीर्तनकार कशा झाल्या, याबाबतचा सांगताना उर्मिलाताई म्हणाल्या, खरे म्हणजे माझे लग्न झाले पण मी सासरी नांदायलाच गेले नाही. लहानपणापासून साधूसंतांचे सानिध्य लाभले आणि त्यातच मी रमू लागले.
घराजवळच्या हिराबाई यांच्याकडे साधू-संत येत असे. त्यांचे सानिध्य लाभले. पुढे गुरू लक्ष्मण महाराज आळंदीकर यांच्यासोबत अनेक दिवस फिरले. चव्हाण गुरूजी, संत बकाराम महाराज चारगाववाले यांनी कीर्तन करण्यासाठी प्रोत्साहित केले.
सुरूवातीला आपल्या घरातच देव्हाऱ्यासमोर उभे राहून कीर्तन करीत असे. नंतर लोक कीर्तनासाठी बोलवू लागले. वारकरी संप्रदायावरील ज्ञानोबा-तुकोबांवर आधारित कीर्तनात अभंगावर आधारित निरूपण मी करते. त्यात आध्यात्मिक ज्ञानासोबत दारूबंदी, व्यसनमुक्तीवर विशेष जोर देते. त्यामुळे चंद्रपूरपासून तर पंढरपूरपर्यंत माझी कीर्तने झाली आहेत.
अजूनही आपल्या म्हाताऱ्या आईसोबत राहात असलेल्या उर्मिलाताई वेळप्रसंगी उदरनिर्वाहासाठी फर्निचरचे परंपरागत काम करतात. भक्तीमार्गात मी रमत असले तरी कोणत्या आश्रमात राहून देव मिळत नाही. तो इथेच राहून मिळतो, असे उर्मिलाताई सांगतात. आता शासनाच्या समाजकल्याण विभागाने कीर्तनकारांना दीड हजार रुपये महिना देण्याची घोषणा केली आहे. त्याचा नक्कीच उदरनिर्वाहासाठी हातभार लागेल, असे त्या सांगतात. आज समाजात कीर्तनकार बरेच असले तरी स्वत: दारूला हात न लावणारे, तंबाखू, गुटखा न खाणारे किंवा कोणतेही व्यसन न करणारे किती आहेत? कीर्तनकारांनी आधी स्वत: आपले आचरण सुधारून नंतरच लोकांना सांगावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)