साडेतीन कोटींचे धान यावर्षीही मातीमोल होणार

By Admin | Updated: May 8, 2014 23:51 IST2014-05-08T23:51:01+5:302014-05-08T23:51:01+5:30

सालेकसा तालुक्यात एकूण पाच ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकारक्षेत्रात आदिवासी सहकार सोसायटीच्या वतीने वर्ष २०१३-१४ च्या खरीप हंगामात धान खरेदी करण्यात आले

There will be three and a half million paddy this year | साडेतीन कोटींचे धान यावर्षीही मातीमोल होणार

साडेतीन कोटींचे धान यावर्षीही मातीमोल होणार

विजय मानकर - सालेकसा

सालेकसा तालुक्यात एकूण पाच ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकारक्षेत्रात आदिवासी सहकार सोसायटीच्या वतीने वर्ष २०१३-१४ च्या खरीप हंगामात धान खरेदी करण्यात आले. हा २४ हजार क्विंटल धान असून आतापर्यंत त्या धानाची उचल झालेली नाही. विशेष म्हणजे हा धान उघड्यावर असल्यामुळे यंदाचाही धान पुढे मातीमोल तर होणार नाही ना, अशी भिती व्यक्त केली जात आहे. आता पावसाळा जेमतेम दिड महिन्यावर येवून ठेपला आहे. त्यापूर्वीच सतत वादळवारे वाहत आहेत. त्यामुळे धानाला सुरक्षित ठेवण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. २०१०-११ च्या खरीप हंगामातील धानाची उचल आज चार वर्षे लोटूनही झाली नाही. त्यामुळे त्यावर्षीचे पाचही सरकारी सोसायटीतील एकूण जवळपास एक कोटी रुपयाचे धान मातीमोल झाले आहेत. ते धान आता तर जनावरांना सुध्दा खाण्यालायक राहीलेले नाही. उलट त्या ठिकाणी उंदीर, साप, विंचवाचे वास्तव्य बनले आहेत. धान सडल्यामुळे तो माल एवढा विषारी झाला आहेत की तो धान अनावधानाने खाणारी जनावरे सुध्दा मृत्युमुखी पडत आहेत, अशी माहिती पिपरिया येथील सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी दिली. २०११-११ च्या खरीप हंगामाचे खरेदी केलेले धान सालेकसा येथे १७०० क्विंटल, गोरे येथे ४ हजार क्विंटल, पिपरिया येथे साडे चार हजार क्विंटल आणि लोहारा येथे २०० क्विंटल असे जवळपास १० हजार क्विंटलपेक्षा जास्त धान आजही पडून आहे. मागील चार वर्षापासून उघड्यावर असल्याने धानाच्या पोत्यावर झाकण्यात आलेले तिरपालसुध्दा फाडून विखुरलेले आहे. तसेच सतत चार वर्षे पावसाचा मारा पडल्याने पाणी आतपर्यंत शिरून धान पूर्ण सडून मातीमोल झाले आहे.

पावसाळ्यामुळे त्या धानाची विल्हेवाट लावली नाही तर त्या धानापासून एवढी दुर्गंधी पसरेल की, परिसरात रोगराईचा प्रकोप वाढल्याशिवाय राहणार नाही. दुर्गंधीमुळे लोकांंना धान ठेवलेल्या परिसरात जगणे कठीण होऊन जाईल. दुसरीकडे त्या धानाची राखणदारी करीत स्थानिक सोसायटींना लाखो रुपयांचा भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. पिपरिया येथील सोसायटीचे सचिव टी.एन. किरसान यांनी सांगितले की, धानाच्या देखरेखीवर आतापर्यंत २ लाख रुपयापेक्षा जास्त खर्च आलेला आहे. सालेकसा येथेही एक ते सवा लाख रु. खर्च आल्याचे येथील अध्यक्ष मूलचंद गावराने यांनी सांगितले. हीच परिस्थिती गोर्रे आणि लोहारा येथील सोसायटीत आहे, अशी माहिती गावराने यांनी दिली. तालुक्यातील सोसायटींच्या पदाधिकार्‍यांना यंदा दुहेरी चिंता वाढली आहे. एक तर २०१०-११ च्या हंगामातील धान सडून मातीमोल झाले आहेत.

त्याचबरोबर यंदाचा २०१३-१४ च्या खरीप हंगामाचे जवळपास २४ हजार क्विंटल धान, ज्याची किंमत अंदाजे ३ कोटी ६० लाख रुपयाच्या वर आहे, त्याची उचल आतापर्यंत झालेली नाही. यात सालेकसा येथील सोसायटीत ६ हजार क्विंटल, गोर्रे सोसायटीत ३ हजार क्विंटल, लोहारा सोसायटीत ८ हजार क्विंटल, दर्रेकसा सोसायटीत ४ हजार क्विंटल आणि पिपरीया सोसायटीत जवळपास ३ हजार क्विंटल धान खरेदी करून उघड्यावर पडले आहे. अशातच आता उन्हाळी पिकाचे धान कापणीला सुरूवात झाली आहे. पुन्हा शेतकरी आपले धान सोसायटीवर घेवून येतील. अशा परिस्थितीला धान खरेदी करून ठेवणे मोठे अडचणीचे ठरणार आहे, असे सोसायटीचे पदाधिकारी सांगत आहेत. धानाची वेळेवर उचल होत नसल्याने धान उघड्यावर पडून राहिल्याने महामंडळाला कोट्यवधी रुपयाचे नुकसान भोगावे लागते. जर सोसायटीच्या ठिकाणी शासनाने गोडाऊन तयार केले तर धानाला सुरक्षितपणे वाचवून ठेवता येवू शकतो.

Web Title: There will be three and a half million paddy this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.