जनतेतील दुरावा कमी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 01:53 IST2016-07-29T01:53:50+5:302016-07-29T01:53:50+5:30
विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्याला मिळाला तर त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते.

जनतेतील दुरावा कमी होणार
विजय सूर्यवंशी : अर्जुनी-मोरगाव येथे महासमाधान शिबिराची पूर्वतयारी
गोंदिया : विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्याला मिळाला तर त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. समाधान शिबिरातून लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळाल्यास त्यांना योजनांचा लाभ घेणे सोयीचे होते. अशा प्रकारच्या समाधान शिबिरामुळे शासन, विविध यंत्रणा व जनतेतील दुरावा कमी होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
अर्जुनी-मोरगाव येथील प्रसन्न सभागृहात गुरुवारी (दि.२७) महाराजस्व अभियानांतर्गत महासमाधान शिबिराच्या पूर्व तयारी निमित्ताने आयोजित दिव्यांग स्वावलंबन अभियान समाधान शिबिराचे उदघाटक म्हणून डॉ. सूर्यवंशी बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार दयाराम कापगते, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेवराव डोंगरवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, जि.प. सदस्य मंदा कुमरे, तेजुकला गहाणे, पं.स. सदस्य रामलाल मुंगनकर, तहसीलदार सिध्दार्थ भंडारे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांची उपस्थिती होती.
डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी समाधान शिबिरात नागरिकांचे समाधान ज्याप्रमाणे करीत आहेत, त्याप्रमाणे कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे समाधान करावे. समाधान शिबिराला लोकचळवळीचे स्वरु प आले आहे. अनेक नागरिक विविध योजनांची माहिती जाणून घेताना व लाभ मिळण्यासाठी अर्ज भरताना दिसत आहेत. पालकमंत्री बडोले यांच्या प्रयत्नांमुळे हे शिबिर होत आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
माजी आमदार कापगते म्हणाले, शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. परंतु समाधान शिबिराच्या आयोजनामुळे लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळत आहे व लाभ घेणे सोयीचे होत आहे, असे त्यांनी सांगितले.
गहाणे म्हणाल्या, समाधान शिबिर हे लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळण्यास व लाभ घेण्यास उपयुक्त ठरत आहे. समाधान शिबिरामुळे कमी कालावधीत योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. शिबिरामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडणार नाही, असे सांगितले.
शिबिराला अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावपातळीवरील विविध यंत्रणांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध यंत्रणांच्या स्टॉल्समधून लाभार्थ्यांना व नागरिकांना योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी अर्जाचे वाटप करण्यात आले.
या वेळी लाभार्थ्यांना व मृतकांच्या वारसांना योजनेचे धनादेश वाटप केले. जवळपास १७ हजार नागरिक व लाभार्थ्यांनी या शिबिरात आपली नोंदणी केली. दिव्यांग स्वावलंबन अभियानाची तसेच समाधान शिबिराविषयीची माहिती गजानन वाघ यांनी दिली.
प्रास्ताविक तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी मांडले. संचालन डॉ. दिलीप नाकाडे यांनी केले. आभार गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)