पक्षीगणनेचा हिशेबच नाही

By Admin | Updated: February 2, 2015 23:07 IST2015-02-02T23:07:51+5:302015-02-02T23:07:51+5:30

जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशी व विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य आहे. मात्र या पक्ष्यांची वन विभागाकडे अधिकृत नोंद नसल्याने २१ डिसेंबर २०१४ व ११ जानेवारी २०१५

There is no count of calculation | पक्षीगणनेचा हिशेबच नाही

पक्षीगणनेचा हिशेबच नाही

गोंदिया : जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशी व विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य आहे. मात्र या पक्ष्यांची वन विभागाकडे अधिकृत नोंद नसल्याने २१ डिसेंबर २०१४ व ११ जानेवारी २०१५ रोजी दुर्बिणींच्या सहाय्याने गणना करण्यात आली. पहिल्या गणनेला दीड महिन्यांपेक्षा अधिक तर दुसऱ्या पक्षीगणनेला २१ दिवसांपेक्षा अधिकचा कालखंड लोटूनही अद्याप वन व वन्यजीव विभागाने पक्ष्यांच्या संख्येची अधिकृत माहितीच घोषित केली नाही.
पक्षी गणनेंतर्गत तलावांवर वावरणाऱ्या पक्ष्यांना अचूकपणे टिपता यावे यासाठी वन विभागाकडून गणना करणाऱ्यांना दुर्बिणी पुरविण्यात आल्या. त्यातही बहुतेक पक्षीतज्ज्ञ व प्रेमींकडे त्यांच्या दूर्बिण होत्याच. शिवाय टिपण्यात आलेला पक्षी कोणत्या प्रजातीचा आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना वनविभागाने रेडी रेकनर दिले होते. पक्षी गणनेसाठी पक्ष्यांचा वावर असणाऱ्या १७ तलावांची निवड करण्यात आली होती. यात परसवाडा, झिलमिली, बाजारटोला, लोहारा, पठाणटोला, माकडी (गोंदिया तालुका), कुंभारटोली (आमगाव), झालीया (सालेकसा), सलंगटोला, जांभळी (गोरेगाव), मालीजुंगा (सडक अर्जुनी), नवेगावबांध, श्रृंगारबांध, सिरेगावबांध, इटियाडोह, कोहळीटोला (अर्जुनी मोरगाव) व चोरखमारा (तिरोडा) येथील तलावांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे २९ जानेवारी रोजी वन व वन्यजीव विभागाशी सदर पक्षीगणनेच्या संख्येबाबत चौकशी केली असता अद्याप या सर्व तलावांवरील माहितीच अर्धवट मिळाल्याचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. पुन्हा २ फेब्रुवारी रोजी त्यांच्याशी संपर्क साधला असता संख्येची माहिती उपलब्ध झाली, मात्र अद्याप अधिकृत माहिती संकलीत झाली नसल्याचे सांगण्यात आले. यावरून वन व वन्यजीव विभागाचे काम किती संथगतीने सुरू आहे, याची कल्पना केली जावू शकते.
जिल्ह्यातील नवेगावबांधसह अन्य काही तलावांवर देशी व विदेशी अशा ७५ प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर राहतो. जिल्ह्यात येणाऱ्या या पक्ष्यांची नोंद यापूर्वी काही पशु व पक्षीप्रेमी संघटनांकडून ठेवली जात होती. मात्र त्यात वन विभागाचे काहीच घेणे-देणे नसायचे. मात्र विदेशी पक्ष्यांचे जिल्ह्यातील आगमन, त्यात होत असलेली वाढ किंवा घट ही बाब आता वन विभागाने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच राज्य वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी अवघ्या राज्यात पक्षी गणना करण्याचे आदेश काढले. त्यांच्या या आदेशानुसार आता वन विभागाला दरवर्षी पक्षी गणना करणे बंधनकारक झाले आहे. या गणनेतून परिपूर्ण अहवाल तयार करून प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठविला जाणार आहे.
मात्र दोनदा पक्षीगणना होवूनही पक्ष्यांमध्ये घट झाली किंवा वाढ झाली, देशी किती व विदेशी पक्षी किती, या माहितीचा अहवालच वन व वन्यजीव विभागाने अद्याप पूर्णरीत्या तयार केलेला नाही. त्यामुळे वन व वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी पक्षीगणनेला आता कोणता न्याय देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: There is no count of calculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.