बाहेरुन येणाऱ्या लोकांमुळे टेंशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:00:02+5:30
तालुक्यात आतापर्यंत एकूण १७ जणांना कोरोना संसर्ग झाला असून केव्हाही व कुठेही कोरोना रुग्ण सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहराकडे गेलेले लोक गावात परत येताना आधी स्वत:ला क्वारंटाईन करुन न घेता थेट गावात प्रवेश करित आहेत. काही व्यक्ती रात्री गावात पोहचत असून आपल्या घरी क्वारंटाईन न होता बिनधास्तपणे गावात किंवा परिसरात फिरतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून बाहेरुन येणाऱ्यांनी तालुकावासीयांची चिंता वाढविली आहे. तालुक्याची स्थिती चिंताजनक असतानाच मात्र तालुका प्रशासन सुस्त झालेला दिसत आहे. त्यामुळे नागरिक बिनधास्त केव्हाही व कुठेही ये-जा करीत असून या प्रकारामुळे मात्र कोरोनाच्या संकटात अधिक वाढ होत आहे.
तालुक्यात आतापर्यंत एकूण १७ जणांना कोरोना संसर्ग झाला असून केव्हाही व कुठेही कोरोना रुग्ण सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहराकडे गेलेले लोक गावात परत येताना आधी स्वत:ला क्वारंटाईन करुन न घेता थेट गावात प्रवेश करित आहेत. काही व्यक्ती रात्री गावात पोहचत असून आपल्या घरी क्वारंटाईन न होता बिनधास्तपणे गावात किंवा परिसरात फिरतात. अशा लोकांना थांबविणार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
गावातील सामान्य व्यक्तीने त्याला क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशात प्रशासनाने दिशा निर्देश तयार करुन बाहेरुन व गावात येणाऱ्या लोकांवर नजर ठेवून त्यांना आधी क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र यात तालुका प्रशासनातील कोणते अधिकारी-कर्मचारी पुढाकार घेतील किंवा घेतला पाहिजे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. ज्या अधिकाºयाला विचारले जाते तोच आपला हात झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
कर्मचाऱ्यांचे बिनधास्त अपडाऊन सुरुच
आधीपासूनच या तालुक्यातील ८० टक्के कर्मचारी मुख्यालयी न राहता रोज अपडाऊन करतात. दुदैवाची बाब म्हणजे कोरोना काळात सुद्धा जवळपास सर्वच शासकीय-निमशासकीय व खासगी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी अपडाऊनच करीत आहेत. त्यांना नेहमी आपल्या कर्तव्यापेक्षा घरी येण्या-जाण्याची चिंता जास्त असते. येथे येणारे अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात गोंदिया, आमगाव, तिरोडा आणि इतर मोठ्या शहरातून येतात. त्यांच्या येण्या-जाण्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. अशा या बेलगाम अपडाऊन करणाऱ्यांवर आवर कोण घालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे पंचायत समिती बीडीओंसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी अपडाऊन करणारेच आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता पूर्ण पंचायत समितीत अपडाऊन करणारे अधिक कर्मचारी आहेत. कुंपणच शेत खात असेल तर तक्रार कोणाकडे करायची ही परिस्थिती या तालुक्यात दिसून येत आहे. इतर कार्यालयांमध्येही जवळपास तीच परिस्थिती आहे.
नगर पंचायतची अजब कारवाई
नगर पंचायतच्यावतीने मास्क न घालणाऱ्या विरुद्ध दंड वसूल करण्याची मोहीम राबविली जात आहे. परंतु ही मोहीम भेदभाव पूर्ण होत असून कोरोना नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने कमी व अवैध वसूली करणारी जास्त असल्याची ओरड होत आहे. जेथे लोक गर्दी करुन राहतात आणि मास्कचा वापर करीत नाही. तेथे कारवाई न करता रस्त्याने ये-जा करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. बँकांमधील गर्दीकडे कुणीच लक्ष देत नाही. नाकाबंदी करीत असलेले काही पोलीस कर्मचारी बाहेरुन येणाऱ्या लोकांची चौकशी न करता गावातील लोक गावातच कामानिमित्त ये-जा करीत असल्यास त्यांच्याकडूनच मास्क न लावल्याचा दंड वसूल करतात. वास्तविक येथील मुख्य मार्गावरुन छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातून सुद्धा लोक ये-जा करतात. अशा लोकांवर पोलिसांची विशेष नजर असली पाहिजे व कोरोना संसर्गाच्या दृष्टिोकानातून लोकांची चौकशी केली पाहिजे. या बाबीवर अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.