तेंदूफळी व जंगलातील वाड्या ठरताहेत वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ
By Admin | Updated: May 27, 2014 23:48 IST2014-05-27T23:48:36+5:302014-05-27T23:48:36+5:30
तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा

तेंदूफळी व जंगलातील वाड्या ठरताहेत वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ
गोंदिया : तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा पाण्याविना मृत्यूही ओढवत आहे. पाणवठय़ानजीक तेंदूफळी व तलावावर वाड्या लावण्यात आल्याने मनुष्याची रहदारी वाढली. या रहदारीमुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्याने पाण्याविना त्याचा मृत्यू होत आहे. परंतू या घटना उघडकीस येत नाहीत. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तेंदूपत्ता तोडणार्या कंत्राटदारांनी काही प्रमाणात जंगलाला आग लावल्याने लाखोंची वनसंपदा नष्ट झाली. या आगीत होरपळून अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. जंगलातील तेंदूपत्ता संकलन करून तेंदूफळी राखीव जंगल वगळता बहुतांश ठिकाणी सामान्य जंगलातच लावली जात आहे. जंगलात पाणवड्याच्या शेजारीच तेंदूपत्ता फळी उभारली जात असल्याने या पाणवड्यानजीक मनुष्याची रहदारी वाढत आहे. परंतु या रहदारीमुळे तहानलेले वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी त्या पाणवठय़ावर येत नाही. पाणवठय़ाचा परिसर निर्जन झाल्यावर वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी जात असतात. परंतु तेदूपत्ता फळीवर लोकांची रहदारी असल्याने वन्यप्राण्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे जंगलात वन्यप्राणी पाण्याअभावी मृत्युमुखी पडत आहेत. वन विभागातर्फे काही शेतकर्यांना जंगलातील तलावाच्या काठावर वाड्या लावण्याची परवानगी दिली. जिल्ह्यातील बोदलकसा, संग्रामपूर, चोरखमारा, उमरझरी (जांभळी) यासारख्या आणखी बहुतांश तलावावर वाड्या लावण्यात आल्या आहेत. या तलावांवर वन्यप्राणी नियमित पाणी पिण्यासाठी येत असतात. परंतु तलावाच्या काठावर वाड्या लावणारे शेतकरी लावलेली पिके वन्यप्राण्यांनी खाऊ नयेत यासाठी त्या प्राण्यांना वाड्यावरून हाकलतात. जंगलातील तलावाच्या काठावर वाड्या लावत असल्याने, त्या तलावातील पाणी पिण्यासाठी वन्यप्राण्यांसाठी जागा उरत नाही. गोंदिया निसर्ग मंडळाने यापूर्वीसुद्धा ही बाब वनविभागाकडे मांडली आहे. परंतू यावर्षीही तीच परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे. जंगलातील तलावाच्या काठावर वाडी लावण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी गोंदिया निसर्ग मंडळाने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)