जिल्ह्याचे तापमान ४५ डिग्रीच्या घरात
By Admin | Updated: June 8, 2014 00:01 IST2014-06-08T00:01:12+5:302014-06-08T00:01:12+5:30
शनिवारपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यात पाऊस काही फिरकलेला नाही. उलट तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ३१ मे रोजी जिल्ह्यात

जिल्ह्याचे तापमान ४५ डिग्रीच्या घरात
गोंदिया : शनिवारपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यात पाऊस काही फिरकलेला नाही. उलट तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ३१ मे रोजी जिल्ह्यात सर्वाधिक ४५.१ एवढी तापमानाची नोंद घेण्यात आली होती. मागील दिवसांत मात्र हा रिकॉर्ड तुटला असून आता पारा ४५.३ च्या घरात गेल्याची नोंद शासकीय यंत्रणेने घेतली आहे. तर कमाल तापमानासह किमान तापमान सुद्धा चढले असून २९.८ एवढी नोंद घेण्यात आली आहे.
एप्रिलच्या सुरूवातीच्या पंधरवड्यानंतर उन्हाळा आपल्या रंगात आला, तर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली. यावर्षी ३१ मे रोजी सर्वाधिक तापमान ४५.१ अं.से. पेक्षा जास्त नोंदविण्यात आले. यामुळे उष्णतेच्या लाटेने जनजीवनावर तीव्र परिणाम झाला. दुपारी १२ वाजतानंतर घराबाहेर पडणे नागरिकांनी बंद केले आहे. शहरातील रस्ते व बाजारपेठ १२ ते ५ या वेळेत सामसूम असते. एकंदरीत शहरात अघोषित संचारबंदी असते. गेल्या आठ दिवसांपासून सतत गोंदियाचे तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त राहत असल्यामुळे दुपारी १२ वाजतानंतर कोणीच घराबाहेर पडताना दिसत नाही.
नवतपाचा हा कहर म्हणता आला असला तरीही आता नवतपा नसतानासुद्धा तापमान वाढतच चालले आहे. कारण ६ जून रोजी कमाल तापमान ४५.३ अं.से. नोदण्यात आले होते. तर उन्हाची तीच दाहकता ७ जून रोजीही दिसून आली. ७ जून रोजी कमाल तापमान ४५.३ एवढे नोंदण्यात आले. विशेष म्हणजे किमान तापमानही चांगलेच वाढल्याचीही नोंद घेण्यात आली. कमाल तापमान २९.८ अं.से. एवढे नोंद घेण्यात आले. उष्णतेच्या या लाटेने गोंदिया चांगलाच तापत असून अशात कुलरसुद्धा काम करीत नसल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
उष्णतेचा कोप सुरू असतानाच त्यात वेळी-अवेळी होत असलेले भारनियमन जखमेवर मिठाचे काम करीत आहे. उकाड्याने अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक बाहेर निघणे टाळत आहेत. तर भारनियमनामुळे घरात जीव गुदमरू लागला असून नागरिकांसाठी इकडे-आड व तिडके विहीर अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
मान्सून आणखी चार दिवसांनी दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे आणखी चार दिवस या भट्टीत काढावेच लागणार आहेत. यात ही विशेष बाब म्हणजे दिवस तर कडक उष्णतेत कापावा लागतच आहे. मात्र किमान तापमानही २९.८ अं.से. पर्यंत पोहोचल्याने रात्रीही उष्ण लपटांचे चटके बसतच आहे. आता असह्या झालेल्या या उष्णतेपासून मुक्तता मिळावी यासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)