शाळांवर सदस्यांचीच वक्रदृष्टी
By Admin | Updated: February 1, 2016 01:42 IST2016-02-01T01:42:03+5:302016-02-01T01:42:03+5:30
अखेरच्या घटका मोजत असलेल्या शाळांना एक जबाबदार सदस्याच्या नात्याने नवजीवन देण्याचे पवित्र कार्य करण्याचे सोडून ...

शाळांवर सदस्यांचीच वक्रदृष्टी
कपिल केकत गोंदिया
अखेरच्या घटका मोजत असलेल्या शाळांना एक जबाबदार सदस्याच्या नात्याने नवजीवन देण्याचे पवित्र कार्य करण्याचे सोडून नगर परिषदेतील सदस्यांची या शाळांवरच वक्रदृष्टी दिसून येत आहे. कारण पालिकेतील सदस्यांनीच या शाळांतील काही वर्गखोल्या विविध कामांच्या प्रयोजनार्थ काही मंडळांना देण्याची मागणी केली आहे. यासाठी आमसभेत मांडण्यात आलेला प्रस्ताव पारित झाला आहे. या प्रकाराबाबत मात्र समाजमनातून रोष व्यक्त केला जात आहे.
नगर परिषदेच्या आजघडीला १७ प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा व एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची स्थिती काही चांगली नाही. विद्यार्थ्यांअभावी पालिकेच्या या शाळा ओस पडल्या असून यातील काही शाळांचे समायोजन करण्याच्या विचारात खुद्द पालिका आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, पालिकेच्या या शाळा व महाविद्यालयांत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका खाजगी शाळेची संख्या असावी एवढी संख्या पालिकेच्या या शाळा व महाविद्यालयाची आहे.
कोट्यवधींचा खर्च या शाळा व महाविद्यालयांवर नगर परिषद करीत आहे. मात्र पाहिजे तसे प्रयत्न होत नसल्याने विद्यार्थी व पालक पालिकेच्या शाळांकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यासाठी पालिका प्रशासन व शिक्षक हे दोघेही तेवढेच जबाबदार आहेत. पालिका प्रशासनाला शाळांना विद्यार्थ्यांनी भरून काढण्यासाठी काही वेगळे करावे यासाठी वेळ नाही. तर शिक्षकांचे फक्त पगारापुरतेच शाळांशी नाते असल्याचेही आता शहरवासी शाळांची गत बघून बोलू लागले आहेत.
त्यात आश्चर्याची बाब म्हणजे, पालिकेचे सदस्यही आता या शाळांच्या जीवावर उठले आहेत. त्याचे असे की, सदस्यांकडूनच शाळांतील वर्गखोल्या मंडळांना देण्याचे प्रस्ताव आमसभेत मांडण्यात आले आहे. कुणी गरजूंना रोजगार निर्मिती प्रशिक्षणासाठी तर कुणी क्रीडा मंडळांना वर्गखोल्या देण्याचा प्रस्ताव सभेत मांडला असून त्यावर ठराव घेण्यात आला आहे. आज एक-दोन वर्ग खोल्या देण्यात आल्या तर उद्या जाऊन अन्य कुणी आणखी खोल्यांची मागणी करणार.
आज रित्या पडून असलेल्या या शाळा विद्यार्थ्यांनी भरून निघाव्या व त्यांचे गतवैभव परतून यावे यासाठी या जबाबदार सदस्यांच्या प्रयत्नांची गरज आहे. त्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच या शाळांचा कायापालट होणार यात शंका नाही. यासाठी तसे प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.