आमगाव येथे भाजीपाला व किराणा दुकान बंद यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST2021-04-24T04:29:12+5:302021-04-24T04:29:12+5:30
आमगाव : सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजला असून, आमगाव तहसीलसह संपूर्ण राज्यास कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे व मृतकांचीही ...

आमगाव येथे भाजीपाला व किराणा दुकान बंद यशस्वी
आमगाव : सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजला असून, आमगाव तहसीलसह संपूर्ण राज्यास कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे व मृतकांचीही संख्या वाढत आहे. यावर राज्य शासनाने ब्रेक लावण्याकरिता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लॉकडाऊन घोषित केला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात वाढत असलेला कोरोना संसर्ग थांबविण्याकरिता स्थानिक भाजी विक्रेता संघ, किराणा व्यापारी संघटना व स्थानिक प्रशासन व नागरिकांनी २० ते २५ एप्रिल दरम्यान फळ, भाजीपाला, किराणा व इतर व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असताना आमगाव शहरासह तालुक्यातील ठाणा, बोथली, गोरठा, माल्ही, महारीटोला, रिसामा, अंजोरा अशा अनेक गावांत कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यातील आरोग्यसेवाही कोलमडल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच राज्य शासनाकडून लॉकडऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीचे निर्देश देण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा देणारे भाजीपाला विक्रेते, किराणा, दूध, आदी यांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली असून, उर्वरित वेळेत कडक लॉकडाऊनचे निर्देश देण्यात आलेले आहेत. असे असले तरी आमगावातील व्यापारी, भाजी विक्रेते, किराणा व्यावसायिक व लघु व्यावसायिक यांनी संपूर्ण शहरात २० ते २५ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन पाळण्याचे एकमताने ठरविले. यात फक्त औषध दुकानांना सूट देण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण शहरात व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत ‘जनता कर्फ्यू’ पाळला.
बाॅक्स -
तालुका व शहराला सॅनिटाईज करण्याची मागणी
शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा थैमान थांबता थांबेना. या संक्रमनाने आबालवृद्ध सर्वच बाधित होताना दिसत आहेत. परिणामी संक्रमणाची शक्यता आणखी बळावली असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. संक्रमणाची गती कमी करण्यासाठी सॅनिटाईज करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.