भरतीतील घोळामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: July 9, 2014 23:36 IST2014-07-09T23:36:49+5:302014-07-09T23:36:49+5:30
दरेकसा येथे असलेल्या श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकांच्या भरतीत घोळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या शिक्षीकेला संस्थाचालकांनी डावलल्यामुळे विद्यार्थ्यांनी कुलूपबंद आंदोलन सुरू

भरतीतील घोळामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन
संस्थाचालकांनी घेतले : उपाध्यक्षाच्या मुलाला नोकरीवर
सालेकसा : दरेकसा येथे असलेल्या श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकांच्या भरतीत घोळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या शिक्षीकेला संस्थाचालकांनी डावलल्यामुळे विद्यार्थ्यांनी कुलूपबंद आंदोलन सुरू केले आहे.
दरेकसा येथील कनिष्ठ महाविद्यालयात सुनिता अर्जुन अंबुले या २००९ पासून इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना शिकवितात. आता कायम शब्द शासनाने हटविल्यामुळे अनुदान मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या अनुषंगाने प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात एक पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या पदभरतीत २००९ पासून कार्यरत सुनिता अंबुले यांना डावलून संस्था उपाध्यक्षाचा मुलगा अर्जुनलाल कुथेकर यांना घेण्यात आले. ही बाब विद्यार्थी व पालकांना माहित होताच त्यांनी विरोध केला. अंबुलेला घ्या अन्यथा शाळा बंद पाडू असा इशारा देण्यात आला. पालकांना आश्वासन देण्यात आले परंतु अजूनही अंबुलेला रुजू करण्यात आले नाही. म्हणून विद्यार्थ्यानी कुलूप बंद आंदोलन सुरू केले आहे.
विद्यार्थ्यांच्या भूमिकेमुळे आता विद्यार्थ्यांना धमक्या देण्याचे प्रकार काही लोक करीत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. लाल शाई लावू, नुकसान करु असे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. आता गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी जोपर्यंत अंबुलेला नोकरीवर घेण्यात येणार नाही. तोपर्यंत कनिष्ठ महाविद्यालय बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. संस्थेने त्यांना १४ जुलै २०१४ पर्यंत अंतिम निर्णय घेण्याबाबत कळविले आहे. प्राचार्य दिनेश रहांगडाले यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांनी सांगितले, सुनिता अंबुले या २००९ पासून शिकवित असून त्या प्राध्यापकपदास पात्र आहेत. त्यांच नियुक्ती व्हावला पाहिजे होती. परंतु संस्था चालकांनी त्यांना डावलले. त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. संस्थेच्या आदेशाचे पालन करणे माझे काम आहे. ते मी करीत आहे, असे म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)