‘स्टिंग’ने प्रशासनासह नागरिकही झाले जागृत
By Admin | Updated: June 22, 2016 01:36 IST2016-06-22T01:36:24+5:302016-06-22T01:36:24+5:30
नळाद्वारे लाखो लोकांच्या घरी पोहोचणाऱ्या पाण्याची शुद्धता कायम राहावी आणि कोणताही घातपात होऊ नये यासाठी संबंधित प्रशासनाला जागे करण्याचा उद्देश...

‘स्टिंग’ने प्रशासनासह नागरिकही झाले जागृत
गोंदिया : नळाद्वारे लाखो लोकांच्या घरी पोहोचणाऱ्या पाण्याची शुद्धता कायम राहावी आणि कोणताही घातपात होऊ नये यासाठी संबंधित प्रशासनाला जागे करण्याचा उद्देश ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनने साध्य केला. सोमवारी केलेल्या स्टिंगचे वृत्त मंगळवारच्या लोकमतमध्ये प्रकाशित होताच महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने शहानिशा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गोंदिया शहरासह अनेक ठिकाणच्या टाक्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ‘लोकमत’चे वृत्त तंतोतंत खरे असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या सिव्हील लाईन व भीमनगर या दोन्ही नवीन टाक्यांवरची झाकणं गायब होती. रामनगर टाकीवरचे झाकण मात्र शाबूत होते. इतर जुन्या टाक्यांचीही तपासणी केली जात आहे.
बहुतांश टाक्यांच्या कडक सुरक्षेसाठी कोणत्याही विभागाकडे कोणतीही तरतूद नाही. रात्रीच्या वेळी ८-९ वाजेपर्यंत वॉचमन असतो. त्यानंतर खाली कंपाऊंडच्या फाटकाला कुलूप लावून तो निघून जातो. विशेष म्हणजे जीवन प्राधीकरणकडे पूर्वीसारखे या विभागाचे सुरक्षा गार्डही आता नाहीत. आधीचे सुरक्षा गार्ड निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी कंत्राटी गार्ड नियुक्त केले परंतू ते सुद्धा कमी आहेत. त्यामुळे मंगळवारी पोलिसांना पत्र देऊन रात्रीच्या गस्तीदरम्यान पाण्याच्या टाकीच्या परिसरात कोणी जाणार नाही यासाठी लक्ष ठेवण्याची विनंती जीवन प्राधीकरणकडून करण्यात आल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एवढेच नाही तर टाकीच्या परिसरात जाण्यास सक्त मनाई असल्याचा फलक लावण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
विशेष म्हणजे लोकमतचा वृत्तांत मंगळवारच्या अंकात वाचल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकही जागृत झाले. अनेक लोकांनी आपल्या भागातील टाक्यांवर चढून तिथे झाकणं आहेत किंवा नाही याची शहानिशा केली. दुर्दैवाने बऱ्याच टाक्यांच्या बाबतीत सारखीच परिस्थिती दिसून आल्यामुळे नागरिकांनी लोकमतकडे त्या टाक्यांचे फोटो पाठविले. संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना व ग्रामविकास अधिकाऱ्यांना काही नागरिकांनी यासंदर्भात जाब विचारला. त्यांनी तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काय कारवाई केली यासाठी कार्यकारी अभियंता शिवकुमार शर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
अर्जुनीतील जलकुंभ सताड उघडे
खातिया : ग्राम अर्जुनी येथे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सन २०१३-१४ मध्ये ६५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ तयार करण्यात आले, पण त्या जलकुंभावर अद्याप झाकन लावण्यात आले नसल्याची बाब काही जागरूक नागरिकांनी मंगळवारी निदर्शनास आणून दिली. लोकमतमधील स्टिंग आॅपरेशनची बातमी वाचल्यानंतर अर्जुनी येथील सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र गजभिये यांनी त्वरीत सकाळी पाणी टाकीवर जाऊन पाहणी केली. टाकीवर झाकन नसल्याचे त्यांना आढळले. त्यांनी त्वरित ही बाब ‘लोकमत’ला सांगितली. तसेच ग्राम पंचायतला या संदर्भात लेखी निवेदन देऊन कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी त्वरीत टाकीचे झाकन बनविण्याची मागणी केली.(वार्ताहर)
कंत्राटदाराची चूक की झाकणांची चोरी?
जीवन प्राधिकरणमार्फत संचालित गोंदिया शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या सिव्हील लाईन आणि भीमनगर येथील टाक्या दोनच वर्षापूर्वी कार्यान्वित झाल्या आहेत. या नवीन टाक्यांवर वजनदार अशी लोखंडी झाकणे होती. ती गायब कशी आणि केव्हा झाली, असा प्रश्न मंगळवारी जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांना पडला. कदाचित ही संबंधित कंत्राटदाराची चूक असावी किंवा ती झाकणं भुरट्या चोरट्यांनी पळविली असावी, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. दोनपैकी कोणतीही शक्यता असली तरी ती गंभीरच आहे. त्यामुळे तातडीने नवीन झाकणं तयार करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले असल्याची माहिती, उपविभागीय अभियंता आर.एस. मडके यांनी ‘लोकमत’ला दिली.