योजना घराघरांपर्यंत पोहोचवा

By Admin | Updated: June 19, 2016 01:30 IST2016-06-19T01:30:15+5:302016-06-19T01:30:15+5:30

शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांबद्दल मार्गदर्शन व त्याचा लाभ घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे.

Spread the plan to the home | योजना घराघरांपर्यंत पोहोचवा

योजना घराघरांपर्यंत पोहोचवा

पालकमंत्री : अर्जुनीच्या समाधान शिबिरात अधिकाऱ्यांना आवाहन
अर्जुनी मोरगाव : शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांबद्दल मार्गदर्शन व त्याचा लाभ घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. या योजना आपल्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी येत्या १६ आॅगस्ट रोजी संपूर्ण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आगळावेगळा समाधान शिबिर घेण्यात येईल. याचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
गुरुवारी महाराजस्व अभियानांतर्गत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित समाधान शिबिरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सी.एल. पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, परिविक्षाधीन वन विभागाचे अधिकारी राहुल पाटील (भावसे), जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, माजी आ. दयाराम कापगते, कृउबासचे सभापती काशिम जमा कुरेशी, अध्यक्ष नामदेव कापगते, शिवनारायण पालीवाल, जि.प. व पं.स. चे सदस्य उपस्थित होते.
बडोले पुढे म्हणाले, समाधान शिबिराची ही सुरुवात आहे. शासनाच्या संजय गांधी, श्रावणबाळ, नवीन शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटुंब कल्याण, इंदिरा गांधी राष्ट्रीय जीवन निवृत्ती वेतन, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करणे, जमिनीचे आपसी वाटणीपत्र, ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना अधिवास व नॉन क्रिमिलिअर, प्रमाणपत्र, मोजणीची क प्रत व हैसीयत पत्र, मृद आरोग्य पत्रिका, नवीन वीज जोडणी, घरकुल प्रमाणपत्र आदी योजना गाव व घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे. यासाठीच १६ आॅगस्टला शिबिराचे आयोजन केले आहे. लोकाभिमूख सरकार हे मुख्यमंत्र्याचे स्वप्न आहे. या माध्यमातून ते साकार होईल. धान खरेदीची उचल झाली नाही. त्याचे लवकरच निराकरण होईल. धान उचल करण्यासाठी आपण शासनाकडे भूमिका मांडणार आहोत. सेंद्रीय भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. लोकांमध्ये जागरुकता आल्याने हे परिणाम दिसून येत आहेत. दुबार धानपीक घेण्यापेक्षा भाजीपाल्यांची शेती करता आली तर लाभ होईल असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. बँकाच्या आडमूठ्या धोरणामुळे केंद्र शासनाच्या जनधन योजना, अटल पेन्शन योजना, विमा योजनांमध्ये व्यत्यय येतो. महाराष्ट्राचा बहुतांश भाग दुष्काळाच्या छायेत आहे. ते टाळण्यासाठी तलाव व वनसंवर्धनाची गरज आहे. १ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करुन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात सारस आहेत. ही जिल्ह्याला लाभलेली देण आहे. त्यांचे संवर्धन करा. श्री पद्धतीचा लागवड करा. सेंद्रीय शेतीसाठी पुढाकार घ्या. जिल्हा वन व सिंचनाने समृद्ध आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाऐवजी उडीद, मूग व इतर कडधान्याची लागवड केली करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. डॉ. पुलकुंडवार यांनी गावे हागणदारीमुक्त करा. प्रत्येक कुटुंबात निदान एक झाड लावून त्यांचे संवर्धन करा व स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी दिलीप पाटील भूजबळ, रचना गहाणे, दयाराम कापगते यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी संगायो, पट्टेवाटप, सामूहिक दावा पट्टेवाटप, नवीन रेशनकार्ड, वितरण, नरेगा अंतर्गत सानुग्रह अनुदान वाटप, भात बियाणे व आरोग्य पत्रिका वाटप, तूर व धान बियाणे वाटप, विशेष घटक योजनेंतर्गत बैलजोडीसाठी अनुदान, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल अनुदान, पं.स. शेष निधीतून अपंगाना खुर्चीवाटप, जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वितरण, दुधाळ जनावरे अनुदान वाटप, वन्यप्राणी हल्यात मृत्युमुखींच्या वारसांनाना लाभ देण्यात आला. मुंगली येथील मंजुळा बाबुराव राऊत यांचा वीज पडून मृत्यू झाला. वारसांनांना ४ लाख रुपये, कवठा येथील वासुदेव रामजी मडावी यांच्या वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने २५ हजार रुपये देण्यात आले. आत्महत्या करणारे शेतकरी रमेश गणपत पिल्लेवान महागाव व गजानन मारोती काळसर्पे यांच्या वारसानांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, संचालन डॉ. दिलीप काकडे यांनी तर आभार खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

खासदारांची अनुपस्थिती
समाधान शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून खा. प्रफुल्ल पटेल व खा. नाना पटोले यांची नावे आहेत. मात्र त्यांची कार्यक्रमात अनुपस्थिती होती. गावच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे व भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषदेचे आ. राजेंद्र जैन यांची नावे निमंत्रण पत्रिकेत नव्हती. तालुका प्रशासनाने केलेली ही घोडचूक सर्वांना खटकणारी होती. तालुक्यातील सरपंचांना अगदी वेळेवर निमंत्रण दिल्याने अनेकांना शिबिरात सहभागी होता आले नाही. काही जिल्हा परिषद वा पंचायत समिती सदस्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याच्या चर्चा आहे. मंचावर अधिकारी व केवळ भाजप कार्यकर्त्यांचीच उपस्थिती होती. त्यामुळे हा शासकीय मेळावा होता की भाजपाचा मेळावा हा प्रश्न अनेकांना पडला. या समाधान शिबिरात कसलेच समाधान झाले नाही. केवळ भाषणे व लाभार्थ्यांना योजनांचे धनादेश वाटप झाले. स्टॉलमधून योजनांची माहिती दिली जात होती. ही कामे कार्यालयातूनही केली जात आहेत. शिबिराद्वारे केवळ शासकीय निधीची वासलात लावली जात असल्याचा सूर व्यक्त केला जात होता.

शिवसैनिकांशी सोयरसूतक नाही
शिवसेना हा भाजपाचा सत्तेतील मित्रपक्ष आहे. मंत्र्यांच्या शासकीय दौरा कार्यक्रमात शिवसेना कार्यकर्त्यांना शिबिरासाठी बोलावण्याचे कुठलेच निर्देश नाहीत. याऊलट याच पत्रकात भाजप जिल्हा व तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांचा उल्लेख आहे. यावरुन भाजप-सेना हे सत्तेतील मित्रपक्ष असले तरी मतदारसंघात मात्र एकतेचे दर्शन घडताना दिसून येत नाही. या शिबिराबाबत तालुका प्रशासनातर्फे प्रचार व प्रसारच झाला नाही.

Web Title: Spread the plan to the home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.