गोंदियाच्या वॉर्डा-वॉर्डांत फवारणी व फॉगिंग
By Admin | Updated: September 22, 2015 03:11 IST2015-09-22T03:11:02+5:302015-09-22T03:11:02+5:30
डेंग्यू व मलेरियासारख्या डासजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून वॉर्डा-

गोंदियाच्या वॉर्डा-वॉर्डांत फवारणी व फॉगिंग
गोंदिया : डेंग्यू व मलेरियासारख्या डासजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून वॉर्डा-वॉर्डांत फवारणी व फॉगिंगचे काम जोमात सुरू आहे. विशेष म्हणजे पावसाळ््यात वाढणारा प्रकोप बघता विभागाने वॉर्डांत आता आठवडी फेरी सुरू केली असून त्यामुळेच शहरात हे आजार अद्याप आपले हातपाय पसरू शकलेला नाही. मात्र गेल्या ५-६ दिवसातील पावसाने सर्वत्र पाण्याची डबकी साचल्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेसह सर्वांना सतर्क व्हावे लागणार आहे.
पावसाळ्यात आजारांचा सुकाळ असतो. विविध प्रकारच्या आजारांसह डेंग्यू व मलेरिया या डासजन्य आजारांचा प्रामुख्याने या काळात जोर वाढतो. यामुळे पावसाळ््यात डासांवर नियंत्रण मिळविणे हे हिवताप नियंत्रण विभागापुढे एक आव्हानच असते. यात ग्रामीण भागात हिवताप नियंत्रण विभाग कार्यरत राहत असून शहरी भागाची जबाबदारी मात्र नगर परिषदेकडे असते. परिणामी नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या इभ्रतीचाच येथे प्रश्न असतो. एक प्रकारे शहरातील नागरिकांना डासांच्या या आजारांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीच पालिकेच्या आरोग्य विभागावर असते.
त्या दृष्टीने यंदा आरोग्य विभागाने आपली जबाबदारी उत्कृष्टरित्या पेलली असल्याचेही दिसून येत आहे. कारण पावसाळा आता आपल्या शेवटच्या टप्यात असून शहरात या डासजन्य आजारांनी आपले पाय पसरले नसल्याचे दिसून येत आहे.
कारण पालिकेच्या आरोग्य विभागाने वॉर्डा-वॉर्डांत फवारणी व फॉगींगचे काम जोमात सुरू ठेवले आहे. याबाबत शहरातील नागरिकांना काही सांगावयाचे असल्यास पालिकेत संपर्क साधण्याचे आवाहनही आरोग्य निरीक्षक मनकवडे यांनी केले आहे.
पालिकेकडून फवारणी व फॉगींग सारखे सुरक्षेचे उपाय अंमलात आणले जात असले तरिही नागरिकांनीही आपल्या स्वत:च्या सुरक्षेच्या दृष्टीने सहकार्य करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छता ठेवणे, साचलेले पाणी वाहते करणे, मच्छरदानीचा वापर यासारखे घरगुती उपाय अंमलात आणल्यास डासांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. करिता नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य निरीक्षक मनकवडे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)
फवारणीची आठवडी फेरी
४पावसाळा वगळता आरोग्य विभागाकडून पंधरा दिवसांतून फवारणीची फेरी चालविली जाते. मात्र पावसाळ््यात डासांचा जोर वाढतो आणि डेंग्यू व मलेरिया सारखे आजार पाय पसरतात. शहरात यापूर्वी या आजारांचे रूग्णही आढळले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने यंदा आरोग्य विभागाने जुलै महिन्यापासूनच आठवडी फेरी सुरू केली आहे. यात आठ फवारणी कर्मचारी दर आठवड्याला त्या वॉर्डात फवारणी करतात. सातत्याने ही फेरी सुरू असल्याने शहरातील डासांचा प्रकोप कमी दिसत आहे. कारण आठ दिवसांतून नियमीत फवारणी होत असल्याने डासांची उत्पत्ती होऊ शकत नाही. शिवाय पालिकेकडे दोन फॉगींग मशीन असून त्यांच्यामाध्यमातून सातत्याने फॉगींगचे काम केले जात आहे.
टेमिफॉस व बीटीआयचा पुरेसा साठा
४शहरात पालिकेच्या आरोग्य विभागाकडून टेमीफॉस व बीटीआय या कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. जिल्हा हिवताप विभागाच्या संपर्कात राहून यंदा आरोग्य विभाग फवारणीचे काम करीत असून त्यांच्याकडे या कीटकनाशकांचा पुरेपूर साठा उपलब्ध असल्याचे आरोग्य निरीक्षक मनकवडे यांनी सांगितले.