२८ हजार ४०८ नमुन्यांचे करणार माती परीक्षण
By Admin | Updated: June 2, 2016 01:12 IST2016-06-02T01:12:54+5:302016-06-02T01:12:54+5:30
पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मातीतून उपलब्ध होत असल्याने खतांची मात्रा ठरविण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे.

२८ हजार ४०८ नमुन्यांचे करणार माती परीक्षण
५० टक्के नमुने तयार : राष्ट्रीय आरोग्य पत्रिका अभियान
गोंदिया : पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मातीतून उपलब्ध होत असल्याने खतांची मात्रा ठरविण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. माती परीक्षणानंतर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते व त्यानुसार अधिक उत्पादन घेण्यासाठी योग्य खतमात्रा ठरविता येते. त्यासाठी जिल्हा कृषी विभागाला माती परीक्षणासाठी जिल्हाभरातून एकूण २८ हजार ४०८ नमुन्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती कृषी विभागाला मार्च २०१७ अखेरपर्यंत करावयाची आहे.
राष्ट्रीय आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टानुसार, गोंदिया तालुक्यातून पाच हजार ८७४ मातीचे नमुने, गोरेगाव तालुक्यातून चार हजार २२६, तिरोडा तालुक्यातून पाच हजार ८८५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून तीन हजार ६४६, देवरी तालुक्यातून एक हजार ८१२, आमगाव तालुक्यातून दोन हजार ८८९, सालेकसा तालुक्यातून एक हजार ७२३ व सडक-अर्जुनी तालुक्यातून दोन हजार ३४३ असे एकूण २८ हजार ४०८ मातीचे नमुने घेण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत जिल्हाभरातून ५० टक्के मातीचे नमुने घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नमुन्यांच्या परीक्षणानंतर त्यांचा तपासणी अहवाल शेतकऱ्यांना दिला जाईल. त्यानुसार शेतकरी खताची मात्रा ठरवून शेतपिकांना देतील.
मागील वर्षी माती परीक्षणासाठी एकूण १४ हजार ४०८ नमुन्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात गोंदिया तालुक्यातील २ हजार २४७, गोरेगाव १ हजार २१४, तिरोडा २ हजार ८५६, अर्जुनी-मोरगाव १ हजार ७८६, देवरी १ हजार ३९४, आमगाव १ हजार ८०९, सालेकसा १ हजार ७९ व सडक-अर्जुनी तालुक्यातील १ हजार ८१९ नमुन्यांचा समावेश होता. या नमुन्यांची तपासणी करून त्याचा अहवाल शेतकऱ्यांना देवून १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली होती. (प्रतिनिधी)
यावर्षी ४० टक्केपेक्षा जास्त लागवड श्री पद्धतीने
जिल्ह्यात १ लाख ९० हजार हेक्टरमध्ये भात पिकाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. यात श्री पद्धतीने २० टक्के व सुधारित श्री पद्धतीने (ओळीत लागवड) ४० ते ४५ टक्के लागवड करण्यात येणार आहे. तसेच १०० हेक्टरमध्ये मका, सात हजार ४०० हेक्टरमध्ये तूर, मूग, उडीद व इतर कडधान्य प्रत्येकी १०० हेक्टर, १ हजार २०० हेक्टरमध्ये तीळ, १० हेक्टरमध्ये भाजीपाला व १ हजार २०० हेक्टरमध्ये ऊस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे.
गरजेपेक्षा जास्त खत देऊ नका
उत्पादन पूर्ण क्षमतेने घेण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या घटकास मोठे महत्व आहे. गरजेपेक्षा कमी अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध झाल्यास त्यांची वाढ खुंटते व उत्पादन कमी होते. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त खते दिल्यास पिकांवर व जमिनीवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे आरोग्य पत्रिकेतून आपल्या शेतजमिनीला किती खताची मात्र गरजेची आहे हे पाहूनच खत देणे गरजेचे आहे.
पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मातीतून उपलब्ध होत असल्याने खतांची मात्रा ठरविण्यापूर्वी माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. माती परीक्षणानंतर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते व त्यानुसार योग्य खतमात्रा ठरविता येते. मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत सन २०१५-१६ ते २०१७-१८ या तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व गावांत माती परीक्षण करून सर्व शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका वितरित करण्यात येणार आहे.