कीर्तनातून समाजप्रबोधन आजही काळाची गरज
By Admin | Updated: December 3, 2015 02:06 IST2015-12-03T02:06:12+5:302015-12-03T02:06:12+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. समाज प्रबोधनाचा वसा पुढे चालवत संत जैपालदास महाराज यांनी

कीर्तनातून समाजप्रबोधन आजही काळाची गरज
पालकमंत्री बडोले : संत जैपालदास महाराज जन्मशताब्दी कार्यक्रम
गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. समाज प्रबोधनाचा वसा पुढे चालवत संत जैपालदास महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा नष्ट करुन गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य अखंडीतपणे केले. कीर्तनातून समाजप्रबोधन ही आजच्याही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
संत जैपालदास महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवनिमित्त तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे २९ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते.
महोत्सव आयोजन समिती व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य तुषार सूर्यवंशी यांचे प्रबोधनात्मक किर्तन यावेळी झाले. कार्यक्र्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तथागत गौतमबुद्ध या लोकप्रिय चित्रपटाचे अभिनेते गगन मालिक, उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, अखिल विश्वगायत्री परिवारचे जिल्हा समन्वयक मुकुंद भैरम, जिल्हा परिषद मनोज डोंगरे, पंचायत समिती सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, सरपंच देवेनबाई पारधी, उपसरपंच पुरणलाल भैरम उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार
यावेळी ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, लोकप्रतिनिधी, तिरोडा तालुक्यातील उत्कृष्ट महिला बचत गट, उत्कृष्ट शेतकरी, गुणवंत विद्यार्थी तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक चेतन भैरम यांनी तर प्रा.बबन मेश्राम यांनी संचालन केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. कार्यक्रमाला कवलेवाडा येथील ग्रामपंचायतचे सदस्य, गावकरी, युवक-युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रबोधनातून गावकरी भारावले
याप्रसंगी खंजेरीवादक तुषार सूर्यवंशी यांनी खंजेरीवादनातून ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा, संविधानाच्या अभ्यासाबाबत जनजागृती, हुंडाप्रथा, शैक्षणिक जनजागृती, सर्वधर्म समभाव या विषयांवर जनप्रबोधन केले. विविध कार्यक्रमाच्या सादरीकरणातून जनजागृती करण्यात आली. स्पर्धा परीक्षाची तयारी, कौशल्य विकास कार्यक्रमावर आधारित मागदर्शन करण्यात आले.