यंदा विशिष्ट परीक्षा केंद्रावर संपूर्ण वेळ राहणार ‘बैठे पथक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:21+5:30
परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी. आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात येतील. परीक्षा केंद्राच्याबाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

यंदा विशिष्ट परीक्षा केंद्रावर संपूर्ण वेळ राहणार ‘बैठे पथक’
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षेत कॉपीसारखा गैरप्रकार होऊ नये,यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची नियुक्त केली जाते. त्याच मंडळामार्फत शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक व निरंतर शिक्षण यांच्या अधिपत्याखाली भरारी पथके तयार केली जातात. परंतु या भरारी पथकापैकी एक भरारी पथक विशिष्ट केंद्रावर एखाद्या पेपरच्यावेळी पूर्णवेळ थांबून (बैठे पथक) परीक्षेतील गैरप्रकार टाळतील.काही परीक्षा केंद्राच्या संपूर्ण परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण करणार आहेत.
१८ फेब्रुवारीपासून तर १८ मार्च २०२० दरम्यान इयत्ता १२ वी च्या परीक्षा घेण्यात येत आहेत. त्या परीक्षेत कॉपीसारख्या गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक विशिष्ट शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत बसेल. त्या बैठे पथकात कमीत कमी ४ सदस्य असतील. त्यातील दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमधून फेरी मारतील. तर दोन सदस्य परीक्षा केंद्राच्या आवारातून फेरी मारतील.
यातील पथक प्रमुख आपल्या सोयीनुसार सदस्यांची संख्या ठरवतील. परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी. आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात येतील. परीक्षा केंद्राच्याबाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पथकातील सदस्य परस्पर विद्यार्थ्यांना किंवा पर्यवेक्षकांना परस्पर सूचना देणार नाहीत.
त्या सूचना केंद्र संचालक किंवा उपकेंद्र संचालक यांच्या मार्फत देतील. विद्यार्थ्यांना पेरपर लिहिण्यात अथवा परीक्षा संचालनात अडचण होणार नाही याची खबरदारी या पथकालाही घ्यावी लागेल. प्रश्नपत्रिका शाळेतच उघडली जाईल. यंदा दहावी किंवा बारावीचा एकही उपद्रवी केंद्र जिल्ह्यात नाही.
बोर्डाकडून सहा भरारी पथक
बोर्डाकडून दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी सहा भरारी पथक तयार करण्यात आले. त्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी निरंतर व विशेष महिला पथक असे सहा पथक तयार करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती असून त्यात जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, मुकाअ डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, निरंतर यांचा समावेश आहे. तालुका स्तरावर दक्षता समितीत उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार, गटविकास अधिकारी व सदस्य सचिव गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश असणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी दिली आहे.
७४ केंद्रावरून २१४६९ विद्यार्थी देणार परीक्षा
गोंदिया जिल्ह्यात बारावीचे ७४ केंद्र असून या केंद्रावरून २१ हजार ४६९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. इयत्ता दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होत असून १०१ केंद्रांवरून २३ हजार ४१९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
झेरॉक्स सेंटरवर करडी नजर
परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षेच्या वेळी सुरू राहणाºया झेरॉक्स सेंटरवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत. सोबत परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी नेहमीप्रामणे यंदाही कलम १४४ लागू करण्यात आली आहे.