‘मुझे मरने दो’ एवढी एकच रट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST2021-08-04T05:00:00+5:302021-08-04T05:00:07+5:30
केटीएस रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोली गुप्ता या ड्यूटीवर असताना त्यांची नजर या रुग्णावर पडली होती. देवरी ग्रामीण रुग्णालयातून आणलेल्या या रुग्णाला कुणीही भेटायला आले नाही. तसेच ते उपचार करू देत नसल्याने डॉ. गुप्ता यांनी त्यांना आपुलकीने विचारपूस करून आपला डबा जेवण्यास दिला व बघितले असता त्यांच्या पायाला जखम असून त्यात गॅँगरीन झाल्याचे कळले.

‘मुझे मरने दो’ एवढी एकच रट
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील केटीएस रुग्णालयात १३ जुलैपासून भरती असलेल्या त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा अद्यापही पत्ता लागलेला नसून त्यांना भेटायला कुणीही आलेले नाही. मात्र ‘लोकमत’ ने घेतलेल्या बातमीची दखल घेत आता त्या रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. असे असतानाही त्या रुग्णाच्या मनात नेमके काय सुरू आहे हे डॉक्टरांना कळेनासे झाले असून ‘मुझे मरने दो’ फक्त एवढेच शब्द त्या रुग्णाच्या तोंडून निघत आहेत.
केटीएस रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोली गुप्ता या ड्यूटीवर असताना त्यांची नजर या रुग्णावर पडली होती. देवरी ग्रामीण रुग्णालयातून आणलेल्या या रुग्णाला कुणीही भेटायला आले नाही. तसेच ते उपचार करू देत नसल्याने डॉ. गुप्ता यांनी त्यांना आपुलकीने विचारपूस करून आपला डबा जेवण्यास दिला व बघितले असता त्यांच्या पायाला जखम असून त्यात गॅँगरीन झाल्याचे कळले. यावर त्यांनी केटीएस रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची सोय करणारे प्रतीक कदम यांच्याशी संपर्क साधला व तेथूनच हा प्रकार उघडकीस आला. याबाबत ‘लोकमत’ने १ ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित केली. त्यानंतर आता रुग्णालय प्रशासनाने दखल घेत त्या रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा मधुमेह जास्त वाढला असल्याने ते नियंत्रित करण्यासाठी औषध सुरू आहेत. असे असतानाही त्या रुग्णाला जगण्याची इच्छा दिसत नसल्याने ते उपचार घेण्यासाठीही तयार नसून फक्त ‘मुझे मरेन दो’ एवढेच ते डॉक्टरांना बोलत आहेत.
लायन्स क्लबने घेतली त्यांची जबाबदारी
- डॉ. गुप्ता यांनी त्या रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यानंतर पाय बरा होईपर्यंत त्यांना रुग्णालयात ठेवता येणार. मात्र त्यांच्या नातेवाईकांचा पता न लागल्याने त्यानंतर काय होणार असे सांगितले. अशात त्यांची मन:स्थिती सुधारण्यासाठी अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे व डॉ. संजय माहुले यांच्या सहकार्याने मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच लायन्स क्लबचे प्रतीक कदम व कालूराम अग्रवाल यांनी त्या रुग्णासाठी लागणारे औषध तसेच पुढे त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याची सोय करण्याची जबाबदारी घेण्यास सकारात्मकता दर्शविली आहे.