सतपुड्याच्या कुशीत घडले झाडीपट्टीचे दर्शन
By Admin | Updated: January 11, 2015 22:53 IST2015-01-11T22:53:43+5:302015-01-11T22:53:43+5:30
झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचा २२ वा झाडीबोली साहित्य संमेलन येथील ‘स्व. हरिदास बडोले साहित्य नगरी’ खिलेश महाविद्यालय परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आला.

सतपुड्याच्या कुशीत घडले झाडीपट्टीचे दर्शन
विजय मानकर - स्व.हरिदास बडोले साहित्य नगरी सालेकसा
झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचा २२ वा झाडीबोली साहित्य संमेलन येथील ‘स्व. हरिदास बडोले साहित्य नगरी’ खिलेश महाविद्यालय परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आला. त्यामुळे झाडीबोली साहित्य या शब्दापासून अनभिज्ञ असलेले हजारो लोक प्रत्यक्षात झाडीपट्टीच्या संस्कृतीदर्शन घेऊन गदबद झाले. झाडीपट्टीची दंडार, झाडी गौरव गीत, नृत्य नाटक इत्यादी कार्यक्रमासह सर्व साहित्य संमेलनात नवीन उमंग व उत्साह शिगेला पोहचला. शेवटी रविवारी (दि.१२) साहीत्य संमेलनाचा समारोप करण्यात आला.
साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र बडोले हे स्वत: साहित्य रसिक असून उत्कृष्ट नाटककार, नकलाकार व शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख झालेली आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नाने सतपुडा पर्वत रांगेच्या कुशीत महाराष्ट्राच्या पूर्वी टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित त्रिसंगमावर हे २२ वे झाडीबोली साहित्य संमेलन भरले. अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग असून या भागात मोठा प्रमाणावर आदिवासी लोकांचा व त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. या सारख्या ठिकाणी बडोले यांनी झाडीपट्टी व आदिवासी संस्कृतीचे सुरेख संगम घडवून आणले.
यापूर्वी कधीही असे साहित्य संमेलन या भागात झाले नसल्याने ग्रंथदिंडी, पुस्तकपोहा पाहून सालेकसावासी आश्चर्यचकीत झाले. त्याचप्रकारे लोकराम शेंडे यांनी सादर केलेल्या झाडी गौरव गीतात ‘जय बोला जय जय झाडी, जय मा झाडीपट्टी’ च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. त्यानंतर राम महाजन यांच्या ‘दुकोडा’, डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी ‘ भूमिका’, विष्णु भेंडारकर यांचा ‘अनुभव’ आणि राजेंद्र बडोले यांनी सादर केलेली आदव्याची सुपाटी या प्रस्तुतीमुळे परिसरातील लोकांना यांची संकल्पना पटली.
याप्रसंगी अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली. त्याचप्रमाणे बंडोपंत बोडेकर (खंजरी), डॉ. शाम मोहरकर (झाडीपट्टीची रंगभूमी), अंजनाबाई खुणे (झाडीचा झोलना) यांचा सत्कार करण्यात आला.
या साहित्य संमेलनात डॉ. बोरकर, प्रा. ओक, पवन पाथोडे, डोमा कापगते, हिरामन लंजे, सुभाष धकाते, शशीकला गावतुरे, अंजणाबाई खुणे, सुखदेव चौथाल, बाबुराव टोंग, नूरजहां पठाण, चंद्रकुमार बहेकार या जुन्या साहित्यीकांसह या परिसरातील नवीन साहित्यकारांनी सुद्धा आपापला साहित्य ठेवा रसिकांसमोर मांडला. अनेकांनी आपल्या कवितेतून झाडीपट्टी संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. स्थानिक झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष खुशाल साखरे, सचिव महेंद्र वैद्य, कार्याध्यक्ष खेमराज साखरे व त्यांच्या चमूने साहित्य संमेलनाला रंगतदार बनविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच विजय मेश्राम, पांडुरंग भेलावे, मिलिंद रंगारी, देवीदास इंदापवार, दौलत खा पठाण आदी कविंनी संमेलनाला सुरेल बनविले.