बाल कामगारांच्या सात शाळा अधांतरी
By Admin | Updated: June 11, 2014 23:15 IST2014-06-11T23:15:48+5:302014-06-11T23:15:48+5:30
ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते त्या घरातील लहान मुले पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करतात. परंतु त्यांचे पोट भरण्यासाठी आड येतो, तो बालकामगार कायदा. बालकामगारांना त्या

बाल कामगारांच्या सात शाळा अधांतरी
आज बाल कामगारविरोधी दिन : जिल्ह्यात हजारो बालमजूर कार्यरत
नरेश रहिले - गोंदिया
ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते त्या घरातील लहान मुले पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करतात. परंतु त्यांचे पोट भरण्यासाठी आड येतो, तो बालकामगार कायदा. बालकामगारांना त्या कामावरून काढल्यानंतर त्यांच्या घराला आर्थिक
आधार मिळेल, अशी योजना शासनाने तयार केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बालमजुरी कमी होताना दिसत नाही. आजही हजारो बालकामगार विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी प्रस्तावित शाळांचाही अजून थांगपत्ता नाही.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाने १४ फेब्रुवारी २०१४ रोजी केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २७६ बालमजूर आढळले आहेत. या बालमजुरांसाठी सहाय्यक कामगार कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सात संक्रमण शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव
पाठविण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. नवीन सत्र सुरू होण्यासाठी आठवडाही शिल्लक राहीलेला नाही, मग या २७६ बालमजुरांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या शाळा कधी सुरू होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
अत्यंत जोखीमेचे ठिकाण असलेले १८ उद्योग व ६४ प्रक्रिया यात १४ वर्षाखालील काम करणाऱ्या बालकांना शासन बालमजूर म्हणून संबोधते. परंतु १४ वर्षाखालील बालके कापड दुकानात किंवा इतर धोक्याच्या ठिकाणी काम करीत नसल्यास त्यांना
बालमजूर म्हणून संबोधल्या जात नाही, किंवा त्यांच्यावर कारवाईसुद्धा करीत नाही. परंतु हॉटेल, तेंदूपत्ता, बेकरी, विटभट्टी किंवा कारखान्यात धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या बालमजुरांना ते काम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी कामगार आयुक्त
कार्यालयामार्फत प्रयत्न केले जातात.
सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाच्या माहिती प्रमाणे २८ जून २०१३ पर्यंत जिल्ह्यात १४७७ बालमजूर होते. या बालमजुरांसाठी इंडसच्या माध्यमातून ४० विशेष प्रशिक्षण देणाऱ्या शाळा होत्या. त्या सर्व शाळा बंद करून त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात
आणण्याच्या नावावर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात आले. परंतु १४ फेब्रुवारी २०१४ रोजी केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २७६ बालमजूर आढळले आहेत. या बालमजुरांच्या निर्मुलनासाठी गोंदिया तालुक्याच्या अदासी, सालेकसा, कुडवा,
काचेवानी, तिरोडा, मुंडीकोटाच्या जमनानगर व घोगराच्या भीमनगरात संक्रमण शाळा उघडण्यात येणार आहेत. परंतु सत्र आठवडाभरात सुरू होणार असल्याने एवढ्या कमी वेळात या संक्रमण शाळांना मंजूरी व त्या सुरू करण्याची प्रक्रिया कशी होईल
याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.
जिल्ह्यात रेल्वेस्थानक परिसरात भिक्षा मागणाऱ्या व कचरा उचलणाऱ्या बालमजुरांची संख्या हजारोच्या घरात आहे. मात्र त्यांचे मालक कोण हे निर्धारीत नसल्यामुळे या बालमजुरीच्या निर्मुलनासाठी कामगार कार्यालयामार्फत प्रयत्नच केले जात नाही. मुंडीकोटा,
घोगरा, सालेकसाचे बाबाटोली व गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर या बालमजुरांची संख्या अधिक आहे. या बालमजुरांचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात केले जाते. ज्यांचे पालक काम करीत नाही त्यांची मुले बालमजुरी करतात. ज्यांचे पालक काम करतात परंतु ते
व्यसनाधीन आहेत त्यांची मुले बालमजुरी करतात. काही मुले हॉटेलातील चमचमीत खायला मिळेल या आशेने हॉटेलात बालमजुर म्हणून काम करतात.
जिल्ह्यात हजारापेक्षा अधिक मुले बालमजुरी करतात. मात्र गोंदियातील सहाय्यक कामगार कार्यालयाकडे जिल्ह्यात फक्त २७६ बालमजूर असल्याची नोंद आहे.