गावागावांत स्वयंघोषित लाईनमन
By Admin | Updated: February 16, 2015 00:06 IST2015-02-16T00:06:28+5:302015-02-16T00:06:28+5:30
जिल्ह्यात वीज वितरणचा कारभार पूर्णत: ढेपाळला असून एकही लाईनमन गावाकडे फिरकताना दिसत नाही. परिणामी लहान-सहान दुरूस्तीसह इतर कामेही खासगी व्यक्तींकडूनच करून घ्यावी लागत आहेत.

गावागावांत स्वयंघोषित लाईनमन
गोंदिया : जिल्ह्यात वीज वितरणचा कारभार पूर्णत: ढेपाळला असून एकही लाईनमन गावाकडे फिरकताना दिसत नाही. परिणामी लहान-सहान दुरूस्तीसह इतर कामेही खासगी व्यक्तींकडूनच करून घ्यावी लागत आहेत. गावागावांत स्वयंघोषित लाईनमन तयार झाले असून यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. तसेच अनेक गावांमधील डीपीसुद्धा सताड उघड्याच दिसून येतात.
जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. कुठे कुठे शहरी व ग्रामीण विद्युत कार्यालये आहेत. या कार्यालयांतर्गत अभियंते आणि लाईनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. एकेक लाईनमनकडे फिडरनिहाय गावे देण्यात आली आहेत. परंतु लाईनमन कधीही गावात जाताना दिसतच नाही.
तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर गावकरी वीज वितरण कंपनीत तक्रार करतात. परंतु आठ-आठ दिवस लोटूनही विद्युत वितरण कार्यालयातून कुणीही येऊन पहात नाही. शेवटी गावातील खासगी लाईनमनकडून दुरूस्ती करणे भाग पडते. आता तर लहानसहान बिघाड झाल्यास गावकरी तक्रार द्यायलाही विद्युत कार्यालयात जात नाही. सरळ खासगी लाईनमनला शोधून त्याच्याकडून दुरूस्ती करून घेतली जाते. फ्यूज टाकण्यापासून ते खांबावर चढून तार जोडण्यापर्यंची सर्व कामे खासगी लाईनमन करताना दिसून येतात. अशा लाईनमनची गावांमध्ये चलती असून अल्प मोबदल्यात वाटेल ते काम धोका पत्करून ते करीत आहेत.
अनेकदा लाईनमन गावात दुरूस्तीसाठी आले तरी त्यांना खांबावर चढणेच जमत नाही. त्यामुळे गावातील खासगी व्यक्तीच खांबावर चढून दुरूस्तीचे काम करतो. कोणतेही तांत्रिक ज्ञान नसलेले व्यक्ती स्वयंघोषित लाईनमन झाल्याने भीषण अपघात होण्याची नेहमीच दाट शक्यता असते. परंतु थोड्या पैशासाठी ही मंडळी जीवावर उदार होवून दुरूस्तीची कामे करतात. हा सर्व प्रकार कर्मचाऱ्यांपासून ते अभियंत्यांपर्यंत सर्वांनाच माहीत आहे. परंतु कारवाई करणार तरी कसे? कारण एकही कर्मचारी गावात पोहोचतच नाही. परस्परच दुरु स्ती होत आहे. यावरच समाधान मानून शहराच्या ठिकाणी ही मंडळी बिनधास्त वावरताना दिसते.
अनेक तालुक्यातील अनेक गावांमध्ये डीपी अगदी मुख्य रस्त्यावर आणि गावाजवळ आहे. या डीपीला कोणतेही कुलूप लावले जात नाही. त्यामुळे डीपी सताड उघड्याच दिसतात.
अनेकदा लहान मुले खेळत त्या ठिकाणी जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. तसेच फ्यूज गेल्यास खासगी वायरमन फ्यूज घालण्यासाठी बोलाविले जाते.
या सर्व प्रकाराकडे विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लाईनमन व इतर कनिष्ठांच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणणे आता गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)