उत्पादकता वाढविण्याकरिता बीज प्रक्रिया करणे गरजेचे

By Admin | Updated: July 8, 2014 23:33 IST2014-07-08T23:33:29+5:302014-07-08T23:33:29+5:30

पारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब न करता आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करणे काळाची गरज आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढवायचे असेल तर बीज प्रक्रिया करुन बियाण्यांची पेरणी करावी,

Seeds should be processed to increase productivity | उत्पादकता वाढविण्याकरिता बीज प्रक्रिया करणे गरजेचे

उत्पादकता वाढविण्याकरिता बीज प्रक्रिया करणे गरजेचे

काचेवानी : पारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब न करता आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करणे काळाची गरज आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढवायचे असेल तर बीज प्रक्रिया करुन बियाण्यांची पेरणी करावी, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी बीज प्रकियेसंबंधी सांगितले की, सर्व शेतकऱ्यांनी बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी घरी बीज प्रक्रिया करुनच पेरणी करावी. बीज प्रक्रिया करण्याकरिता १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम (३ टक्के) मीठ घालून एकत्रित करावे.
घरचे किंवा घेतलेले बियाणे या मिश्रणात घालून हलविल्याने पाण्याच्या वर तरंगणारे पोचट तनाचे आणि रोगट बियाणे काढून टाकावे. तळाशी असलेले बियाणे स्वच्छ पाण्याने धुवावे. यानंतर ते बियाणे घरी असलेल्या सावलीत वाळवावे. या बियाण्यांना १ टक्के पारायुक्त (थॉयरम किंवा कॅप्टन औषध) चोळून बियाण्यांची गादी वाफ्यावर पेरणी करावी.
गादी वाफ्यावर बियाण्यांची पेरणी केल्यास पाणी देणे सोपे जाते. झाऱ्यांनी पाणी दिले जाते. यात पेरणीचा लागत खर्च कमी लागतो. १५ दिवसांची रोपे झाली की रोवणी करता येते. रोपे काढण्याकरिता पैशाची बचत होते आणि रोपांची नासाडी होत नाही.
गाडी वाफे तयार करुन रोपे तयार करण्याची पद्धती आधुनिक नसल्याने शेतकरी याकडे लक्ष देत नाही. बियाण्यांची पेरणी आजही परंपरागत पद्धतीनेच केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी त्रास सहन करावा लागतो. कृषी विभागाच्या वतीने गावागावात शिबिरे व शेतकऱ्यांच्या सभा घेवून मार्गदर्शन केले जात आहे. काही शेतकरी याचे अनुकरण करीत असल्याचे पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी लोकमतला सांगितले. बीज प्रक्रिया आणि गादी वाफे तयार करताना क्षेत्रीय कृषी सहायक व पर्यवेक्षक यांना विचारुन सल्ला घेवून किंवा प्रत्यक्षात शेतात बोलावून मार्गदर्शन घ्यावे, असाही सल्ला शेतकऱ्यांना पारधी यांनी दिला आहे.
श्री पद्धतीसंबंधी त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकरिता श्री पद्धत वरदान ठरणारी पद्धत आहे. श्री पद्धतीने रोवणी केल्यास दोन रोपांचे अंतर २५-२५ सेमी असावे.
संकरीत किंवा सुधारित शेती करताना शतकऱ्यांना दोन किलो धानात एक एकर शेती पूर्ण केली जाते. एका ठिकाणी एक रोप लावायचा असून लावलेल्या बांधीत पाणी ठेवू नये. त्याच बरोबर बांधी वाळू देवू नये, ही काळजी घेणे गरजेचे असल्याचे कृषी पर्यवेक्षक पारधी यांनी सांगितले.
श्री पद्धतीमध्ये रोपाला जागा अधिक असल्याने वातावरणातील हवा रोपाच्या खोलवर पोहचते. त्यामुळे त्या रोपाची वाढ जोमाने होत असते. काही दिवसांनी फुटण्याची संख्या अधिक होते आणि उत्पादनात भरपूर वाढ होते, असा विश्वास पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी व्यक्त केला. सर्व शेतकऱ्यांनी बियाण्यांची पेरणी करताना गादी वाफ्यांचा उपयोग करावे आणि रोवणी करताना अधिकाधिक शेतकऱ्यांनी श्री पद्धतीचा वापर करावे, असे आवाहन पारधी यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Seeds should be processed to increase productivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.