५० टक्के अनुदानावरील बियाणे उपलब्ध
By Admin | Updated: July 8, 2014 23:31 IST2014-07-08T23:31:59+5:302014-07-08T23:31:59+5:30
अनेक दिवसांपासून शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांवर ओढवलेले हे संकट बघून जिल्हा परिषद प्रशासनाने दुबार पेरणीसाठी ५० टक्के अनुदानावर आठ क्विंटल

५० टक्के अनुदानावरील बियाणे उपलब्ध
अधिकारी-पदाधिकाऱ्यांना निर्देश : एक एकर शेतजमिनीसाठी पाच किलो बियाणे देणार
गोंदिया : अनेक दिवसांपासून शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांवर ओढवलेले हे संकट बघून जिल्हा परिषद प्रशासनाने दुबार पेरणीसाठी ५० टक्के अनुदानावर आठ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. तसेच मागणीनुसार बियाण्यांचा पुरवठा केला जाईल, असे जि.प. कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी सांगितले आहे.
सोमवार (दि.३० जून) रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जि.प. चे अध्यक्ष विजय शिवणकर व कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी संबंधितांची तत्काळ बैठक बोलावली होती. यात जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याचे प्रमुख पीक धान असून त्यानुसार पाऊस पडणे गरजेचे होते. मात्र दोन आडवड्यांपासून पाऊस गायब झाले. पेरलेले बियाणे सडले तर पाण्याअभावी काही बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे सदर बैठकीत जर दोन दिवसात पाऊस पडले नाही तर जिल्हा परिषदेच्या निधीतून १० लाख रूपये खर्चून बियाणे खरेदी करण्यात येतील व शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर वितरीत केले जातील, असा निर्णय घेण्यात आला होता.
जि.प. ने घेतलेल्या निर्णयानुसार, सध्या हलक्या वाणाचे आठ क्विंटल हायब्रिड बियाणे खरेदी करण्यात आले आहे. हे आठ क्विंटल बियाणे १५० एकर शेतीसाठी पर्याप्त असल्याचे कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी सांगितले आहे. एका एकरला पाच किलो बियाणे पुरतील. याशिवाय शेतकऱ्यांची जसजसी मागणी असेल तसतसे बियाण्यांची खरेदी करून त्यांचा पुरवठा केला जाईल. अतिरिक्त बियाणे खरेदी केले व शेतकऱ्यांनी त्या बियाण्यांची उचल केली नाही तर कंपनी खरेदी केलेले बियाणे परत घेत नाही. त्यामुळे सध्या आठच क्विंटल बियाणे जि.प. ने खरेदी केलेले आहे. मात्र शेतकऱ्यांची मागणी असल्यास आणखी बियाणे खरेदी करून ते ५० टक्के अनुदानावर वितरीत केले जातील, असा विश्वास कटरे यांनी व्यक्त केला.
सोमवार (दि.७) रोजी जि.प. च्या कृषी विभागात अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेवून त्यांना शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ५० टक्के अनुदानावर उपलब्ध झालेल्या या हलक्या जातीच्या हायब्रिड बियाण्यांचीच शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी उचल करावी, असेही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)