शाळा झाल्या सकाळपाळीत; शिक्षक संघाच्या प्रयत्नांना यश
By Admin | Updated: July 8, 2014 23:33 IST2014-07-08T23:33:49+5:302014-07-08T23:33:49+5:30
जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व अनुदानित, विनाअनुदानित शाळा २६ जूनपासून ३० जूनपर्यंत सकाळपाळीत भरत होत्या. मात्र १ जुलैपासून सर्व शाळा दुपारच्या करण्यात आल्या होत्या.

शाळा झाल्या सकाळपाळीत; शिक्षक संघाच्या प्रयत्नांना यश
गोंदिया : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व अनुदानित, विनाअनुदानित शाळा २६ जूनपासून ३० जूनपर्यंत सकाळपाळीत भरत होत्या. मात्र १ जुलैपासून सर्व शाळा दुपारच्या करण्यात आल्या होत्या. प्रचंड उकाडा व पाऊस पडत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय होत होती. त्यामुळे शिक्षक संघाने सर्व शाळा सकाळपाळीत करण्याबाबत जि.प.च्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामुळे जि.प. प्रशासनाने सर्व शाळात सकाळपाळीत केल्याची माहिती पिपरियाचे शिक्षक एस.पी. रहांगडाले यांनी दिली आहे.
जुलै महिन्याची सुरवात होऊनसुद्धा वरुण राजाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील तापमान अद्याप ४० डीग्रीच्या आसपासच कमीजास्त होत आहे. अशातच वर्ग पहिली ते सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना उष्णतेचे चटके बसत असल्यामुळे ताप येणे, चक्कर येणे, उल्टी होणे अशाप्रकारच्या आजार विद्यार्थ्यांना होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून प्राप्त होत होत्या. तसेच पाऊस पडण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत, शाळेचे वीजबिल, पाण्याची सोय याबाबतच्या तक्रारी शिक्षक संघास प्राप्त झाल्या.
या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिक्षक संघाने विरेंद्र कटरे यांच्या नेतृत्वात डी.टी. कावळे, एम.यु. वंजारी, केदार गोटेफोडे, सुशील रहांगडाले, चौरे, बांगर, चुटे, नागसेन भालेराव, बोपचे यांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळपाळीत करण्याची मागणी केली. सदर विषयाला घेवून जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष मदन पटले तसेच शिक्षणाधिकारी पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
शिक्षक संघाच्या मागणीची तत्काळ दखल घेवून जि.प. प्रशासनाने शाळा सकाळपाळीत करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने जि.प. प्रशासनाचे आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)