आमचे संसार तुटण्यापासून वाचवा हो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 01:55 IST2016-03-27T01:55:15+5:302016-03-27T01:55:15+5:30
‘ज्यांनी स्वत: उपाशी राहून आम्हाला शिकवलं, शिक्षक बनवलं त्या आई-वडिलांना आता आमची गरज असताना आम्ही त्यांची सेवा करू शकत नाही.

आमचे संसार तुटण्यापासून वाचवा हो...
शिक्षकांची आर्त हाक : आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण
गोंदिया : ‘ज्यांनी स्वत: उपाशी राहून आम्हाला शिकवलं, शिक्षक बनवलं त्या आई-वडिलांना आता आमची गरज असताना आम्ही त्यांची सेवा करू शकत नाही. आता आमचा भरला संसार तरी मोडू नका. पती एकीकडे तर पत्नी ६०० ते १००० किलोमीटर अंतरावरच्या जिल्ह्यात, कसा चालत असेल आमचा संसार? अहो चालतो कशाचा, चक्क तुटण्याच्या मार्गावर आहे. अनेकांचे तर घटस्फोटही झाले. पण आमची व्यथा ना जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली, ना कोण्या अधिकाऱ्याने. आता एकमेव पर्याय म्हणून सहकुटुंबच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे...’
ही व्यथा शनिवारी शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांसमोर मांडली. २०१२ पासून आंतरजिल्हा बदली होऊन स्वगृही गोंदिया जिल्ह्यात येऊ पाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवून थकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेल्या आणि राज्यातील इतर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना कोणीही दाद देण्यास तयार नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांपासून तर सर्व पदाधिकारी, एवढेच नाही तर विरोधी पक्षातील सदस्यांपर्यंत सदर शिक्षकांनी आंतरजिल्हा बदल्या सुरू करण्यासाठी गळ घातली. पण कोणाचाच पायपोस कोणात नसल्यामुळे टोलवाटोलवी करण्याशिवाय त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे येत्या २८ मार्चपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करीत असल्याचे कृती समितीचे रविंद्रकुमार अंबुले यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हाभरात शिक्षकांची १०४ पदे रिक्त
३० सप्टेंबर २०१५ च्या पटसंख्येवरून जिल्हा परिषदेच्या शाळांची संचमान्यता निश्चित करण्यात आली. त्यात पदोन्नतीची पदे भरल्यानंतर शिक्षकांची १०४ पदे रिक्त होणार असल्याची माहिती शिक्षक आंतरजिल्हा बदली कृती समितीला शिक्षण विभागाकडून देण्यात आली. मात्र ही प्रक्रिया करण्यास विलंब लावला जात आहे. मे महिन्यात पदोन्नतीची पदे भरली जातील. त्यानंतर आंतरजिल्हा बदल्या केल्या जातील असे सांगून जिल्हा परिषदेकडून चालढकलपणा केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेला बाबुगिरीचे ग्रहण
जिल्हा परिषदेत कोणातही ताळमेळ नाही. सर्व कारभार बाबुगिरीच्या हाती आहे. पदाधिकारीच नाही तर अधिकाऱ्यांचाही कोणावर वचक नाही. बदलीसंदर्भात विचारणा करण्यासाठी बाबूलोकांकडे गेलो तर दोन-तीन वर्षे इकडे येऊच नका, असा सल्ला ते देतात. कारभारात स्पष्टता नाही. त्यामुळे नेमके काय गौडबंगाल आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही. बाबूगिरीत अडकलेल्या जिल्हा परिषदेला कोणीतरी बाहेर काढावे, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.
- असे शिक्षक, अशा व्यथा
शुभांगी चौधरी : गोंदियातील तिरोडा माहेर असलेल्या शुभांगी चौधरी यवतमाळ जिल्ह्यात आपल्या १४ महिन्याच्या मुलीसोबत एकट्या राहतात. इकडे घरी पती आणि सासरे आहेत. पण पतीपत्नी एकत्रिकरणाचाही त्यांना लाभ मिळालेला नाही.
रविंद्रकुमार अंबुले : गोंदियाचे अंबुले साडेसात वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात कार्यरत आहेत. शिकवून तुला आम्हीच दूर केले. त्यापेक्षा अशिक्षित ठेवून शेळ्या चारण्यासाठी पाठविले असते तर आमच्या जवळ तरी राहिला असता, अशी व्यथा त्यांचे आई-वडिल त्यांच्याकडे व्यक्त करतात.
नंदकुमार उईके : पत्नी दासगाव येथे शिक्षिका तर उईके राज्याच्या दुसऱ्या टोकावरील कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. येण्याजाण्याच्या प्रवासातच ४ दिवस जातात. कसे यायचे, कुटुंबियांना कधी भेटायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
राहुल नंदागवळी :जालना जिल्ह्यात ड्युटी असलेले नंदागवळी म्हणतात, आता आमचे शिकवण्यातही लक्ष लागत नाही. मानसिकता बिघडत चालली.
यासोबतच प्रकाश बन्सोड (परभणी), सुरेंद्र गौतम (नांदेड), राजकुमार वरखडे (गडचिरोली), मुकेश खरकाटे (हिंगोली), प्रमोद शहारे, तुषार सिंगनजुडे या शिक्षकांनीही आपल्या व्यथा मांडल्या.