वाळू माफिया करीत आहेत वाघनदीचे दोहन
By Admin | Updated: July 5, 2014 23:40 IST2014-07-05T23:40:39+5:302014-07-05T23:40:39+5:30
सालेकसा-आमगाव मार्गावर साखरीटोला घाटावरून वाघनदीतून बेलगाम होऊन मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पवित्र वाघ नदीचे मोठे दोहन होत असून साखरीटोला घाट

वाळू माफिया करीत आहेत वाघनदीचे दोहन
विजय मानकर - सालेकसा
सालेकसा-आमगाव मार्गावर साखरीटोला घाटावरून वाघनदीतून बेलगाम होऊन मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पवित्र वाघ नदीचे मोठे दोहन होत असून साखरीटोला घाट परिसराचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. मात्र महसूल विभाग याकडे बघ्याची भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सालेकसा-आमगाव तालुक्याच्या सीमेवरून वाहत असलेल्या वाघ नदीवर साखरीटोलानजीक दोन्ही बाजूला घाट परिसर आहे. सालेकसाच्या बाजूला पिंडदान करण्याचे तर आमगावच्या बाजूला प्रेतांचे दाह संस्कार करण्याचा परिसर आहे. परंतु दुर्दैव असे की, याच परिसरातील रेती घाटसुध्दा लिलाव करण्यात येतात. त्यामुळे या ठिकाणातून मोठ्या प्रमाणावर सतत वाळू उत्खनन कार्य सुरू असते. यंदा पावसाने पाठ फिरविली असून एकीकडे शेतकरी वर्ग गहन चिंतेत सापडला आहे तर दुसरीकडे पावसाने हुलकावणी देणे वाळू माफियांसाठी वरदान ठरणारा वेळ दिसत आहे.
पाऊस येत नसल्याने घाटावरून नदी पात्रातून वाळू वाहण्यासाठी ट्रॅक्टर ये-जा करण्यासाठी सोयीचे होत आहे. त्यामुळे वाळू माफियांना पावसाळ््यात वाळूचा साठा ठेवून दुप्पट भावाने वाळू विकण्याची संधी मिळत असते. अनेक वाळू माफिया असे असतात की, ते एका ट्रीपच्या लीजवर चार-पाच ट्रीप वाळू उत्खनन करून नेण्याचे प्रकार घडत असतात.
यात काही महसूल कर्मचाऱ्यांचेसुध्दा संगनमत असते. जर कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचासुध्दा प्रयत्न केला जातो. असे अनेक प्रकार काही ठिकाणी घडले आहेत. अनेकांना तर राजकीय संरक्षणसुध्दा असते. त्यामुळे ते सर्रास वाळू उत्खनन करीत असतात.
साखरीटोला घाटावरून होणारे वाळू उत्खनन दाह संस्कार व पिंडदान करण्याच्या परिसरातून होत असल्याने या ठिकाणी नदी पात्राचे मोठे दोहन होताना दिसत आहे.
त्याच बरोबर लोकांच्या आस्थेवर व दाह संस्कार करण्याचा कामावर कुठाराघात होत असल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण आमगाव शहराचे लोक तसेच आमगाव, सालेकसा व लांजी तालुक्यातील लोक पिंडदान व प्रेताचे अग्निसंस्कार करण्यासाठी वाघ नदीच्या पात्रात येतात व पवित्र जल प्रवाहाच्या किनाऱ्यावर वाळूवर आपल्या पध्दतीनुसार संस्कार करतात.
परंतु त्याच ठिकाणातून वाळूचे सर्रास उत्खनन होत असल्याने वाघ नदीचे मोठे दोहन तर होतच आहे. त्याचबरोबर भविष्यात लोकांंना दाह संस्कार व पिंडदानासाठी योग्य स्थान मिळणार नाही याचा धोका निर्माण होत चालला आहे. विशेष म्हणजे दाह संस्कार परिसरातून वाळू उत्खनन करून ग्राहकांपर्यंत पोहचविणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये वाळूसोबत मानवी हाडसुध्दा जात असतात. अनेक लोक आपले पवित्र व सुंदर घर निर्माण करण्यासाठी वाळू बोलवितात.
परंतु त्यांच्या घरी वाळूसोबत मानवी हाड दिसले की त्यांना फार वाईट वाटते व अपवित्र झाल्यासारखे वाटते. हा सर्व प्रकार पाहून महसूल विभागाने वाळू काढण्याचे घाट इतर ठिकाणी निश्चित केले पाहिजे. सध्या पावसाने दडी मारल्याने शेकडोच्या संख्येने ट्रॅक्टरद्वारे वाघ नदीतून सर्रास वाळू वाहतानाचे भयानक चित्र रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना दिसत आहे.