साहेब, त्या बंधाऱ्यांत पाणी अडेल काय?

By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:58+5:302015-12-05T09:07:58+5:30

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात मोठया प्रमाणात बंधारे बांधण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात एक थेंब पाण्याचा दिसत नाही.

Saheb, what obstacles in the dams? | साहेब, त्या बंधाऱ्यांत पाणी अडेल काय?

साहेब, त्या बंधाऱ्यांत पाणी अडेल काय?

सडक अर्जुनी : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात मोठया प्रमाणात बंधारे बांधण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात एक थेंब पाण्याचा दिसत नाही. नियोजनशून्य कारभाराचे हे फलीत असल्याचे मूर्त उदाहरण असून फक्त पैसा पाण्यात टाकण्याचा प्रकार तालुक्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या योजना चांगल्या असतात पण राबविणारी यंत्रणाच बरोबर नसल्यास योजनेचे तीन तेरा वाजायला वेळ लागत नाही.
पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेत राज्यशासनाकडून राज्यात जलयुक्त शिवार योजना मोठ्या धडाक्यात राबविली जात आहे. कृषी विभाग, वन विभाग, लघु पाटबंधारे, सार्वजनिक पाटबंधारे आदी विभागांच्या माध्यमातून ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ हा उपक्रम राबविला जात आहे. या योजनेंतर्गत कोट्यवधी रूपये खर्चून बंधारे बांधण्याचा धडका तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील डव्वा, सौंदड, हेटी, डोंगरगाव/डेपो, कोकणा/जमी., शेंडा, पांढरवाणी, जांभळी, कोसमतोंडी, पांढरी या परिसरात पाणी अडविण्यासाठी मोठमोठे बंधारे बांधले आहेत व सध्या बंधारे बांधण्याचा धडाका सुरूच आहे. मात्र पावसाळा निघून गेल्यावरही आजघडीला या बंधाऱ्यांत एकही थेंब पाणी अडल्याचे दिसून येत नाही.
बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडविल्यास जमिनितील जलस्तर वाढणार. याचा मानवासह वन्यप्राण्यांनाही सहारा मिळणार. विशेष म्हणजे पाण्याची व सिंचनाची सोय होणार या मागचा मुख्य उद्देश आहे. मात्र पावसाचा लहरीपणा उलट परिस्थिती आणते. परिणामी शेतीसाठी भूगर्भातील पाण्याच्या उपसामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी जवळजवळ सर्वच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे काम होत आहे.
यातूनच डव्वा परिसरात एकाच नाल्यावर पाच ते सात बंधारे बांधण्यात आले. अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे हे बंधारे बांधल्यामुळे त्या बंधाऱ्यांजवळ आजघडीला एकही थेंब पाणी नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जलयुक्त शिवार हा अभियान खऱ्या अर्थाने राबविल्यास तालुक्यातील शेतकरी ‘सुजलाम सुफलाम’ झाल्याशिवाय राहणार नाही. पण कोणताही अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे समस्या बिकट होताना दिसत आहे. अभियानाच्या नावावर अधिकारी फक्त कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त दिसतात, हे विशेष. त्यामुळे कोट्यवधींचा चुराडा करूनही पाणी दिसत नसल्याने आता एक अडाणीही साहेब, या बंधाऱ्यांत पाणी अडेल का असा टोमणा मारत आहे.

Web Title: Saheb, what obstacles in the dams?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.