कचारगडचा मार्ग झाला सुकर
By Admin | Updated: February 5, 2016 01:14 IST2016-02-05T01:14:59+5:302016-02-05T01:14:59+5:30
देशातील २० कोटी आदिवासींचे श्रध्दास्थान असलेले सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थान आणि आशिया खंडातील सर्वात महाकाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुफेला...

कचारगडचा मार्ग झाला सुकर
विजय मानकर सालेकसा
देशातील २० कोटी आदिवासींचे श्रध्दास्थान असलेले सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थान आणि आशिया खंडातील सर्वात महाकाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुफेला पाहण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांसाठी आता कचारगडची वाट सुकर झाली आहे. त्यामुळे मागील ३० वर्षापासून होत असलेल्या मागण्यांपैकी ही मागणी पूर्ण झाली आहे.
यावर्षी २० फेब्रुवारीपासून कचारगड यात्रा सुरू होत आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कचारगड गुफेपर्यंत जाऊन झालेल्या कामांची पाहणी केली. जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ५८ किमी आणि सालेकसा तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेले कचारगड देवस्थान तथा कचारगड गुफा घनदाट जंगलात आहे. हे स्थळ महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या टोकावर असल्याचे या तीन राज्यातीलच नाही तर इतर राज्यातीलही भाविक येथे दरवर्षी माघ पौर्णिमेच्या यात्रेसाठी येत असतात. यावर्षी पाच लाखाच्यावर भाविक येथे पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांची या ठिकाणी गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज होत आहे.
यंदा कचारगड यात्रा येत्या २० फेब्रुवारीपासून सुरू होत असून प्रशासनाच्या वतीने भाविकांना कोणकोणत्या सुविधा दिल्या जाव्यात, त्यांच्यासाठी सुरक्षा, आरोग्य, निवारा, प्रवास साधन, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, या व्यतिरीक्त भौतिक सोयीबद्दल प्रशासन काय करू शकेल याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या चमुने बुधवारी कचारगडला भेट दिली. यात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, प्रभारी एसडिपीओ इलमकर, आगार प्रमुख शेंडे, तहसीलदार प्रशांत सांगळे, खंडविकास अधिकारी यशवंत मोटघरे, पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांच्यासह जि.प.सदस्य विजय टेकाम, विद्युत अभियंता गजभिये, आरएफओ अवगान, बांधकाम अभियंता व आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारीसुध्दा उपस्थित होते.
खडतर वाट तुडविण्याचा त्रास वाचणार
या ठिकाणी पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर दर्रेकसा येथील छोट्या व लोकल गाड्याचा थांबा असलेल्या स्टेशनवर उतरावे लागते. तसेच लांबून येणाऱ्या लोकांना एक्सप्रेस गाडीने प्रवास केल्यास पूर्वेकडे डोंगरगड, दुर्ग येथे तर पश्चिमेकडे सालेकसा, आमगाव किंवा गोंदिया येथील रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. दर्रेकसा रेल्वे स्टेशन गाठल्यानंतर उत्तरेकडे ५ किमी अंतरावर पायी चालावे लागते.
धनेगावपासून जंगलाची वाट धरल्याांतर शेवटचा तीन किमीचा टप्पा अतिशय खडतर, डोंगराळ, झाडी-झुडपातून जाणारा तसेच मोठ्या दगडांवरून चढ-उतार करून जाणारा होता. त्यामुळे मागील ३२ वर्षापासून सतत ये-जा करणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक गैरसोयींचा सामना त्यांना करावा लागत होता. यंदा मार्गाची डागडुजी करून आणि अनेक ठिकाणी पायऱ्यांची सोय केल्याने बराच दिलासा मिळणार आहे.
प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी
एसटीच्या अतिरीक्त फेरी लावण्यासाठी आगार प्रमुखांशी चर्चा झाली आहे. तसेच इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना प्रवासाच्या सोयी करण्यासाठी दर्रेकसा रेल्वे स्टेशनवर काही एक्सप्रेस गाड्या थांबविण्यासाठी रेल्वे विभागाशी चर्चा यशस्वी होत आहे. याचबरोबर पिण्याचे शुध्द पाणी, ठिकठिकाणी मदत करणारी सुरक्षा यंत्रणा, प्राथमिक औषधोपचार सुविधा इत्यादीसाठी सतत पाठपुरावा केला जाईल व यंत्रणा सदैव तत्पर राहील, अशी हमी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी गुफेत पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. या जिल्ह्याला कचारगडसारखा ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक पर्यटनस्थळ लाभल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या स्थळाला प्रकाशझोतात आणल्याबद्दल त्यांनी ‘लोकमत’चे विशेष कौतुक केले.