जिल्ह्यात रोहयोच्या कामांचा बट्ट्याबोळ
By Admin | Updated: June 16, 2014 23:35 IST2014-06-16T23:35:06+5:302014-06-16T23:35:06+5:30
रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे

जिल्ह्यात रोहयोच्या कामांचा बट्ट्याबोळ
गोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे या योजनेंतर्गत रोजगारांना कामच मिळत नसल्याने ही योजना आता फक्त नावापुरतीच शिल्लक राहली असल्याची प्रतिक्रिया मजूर वर्गामधून उमटत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी या योजनेंतर्गत विविध कामे आहे. मात्र या कामांवर एकही मजूर काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधीची कामे करण्यात येतात. मात्र हे काम करताना किती लोकांना कामे मिळतात हा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात या योजनेंतर्गत पंचायत समितीस्तरावर कामे करण्यात येत आहेत. यामध्ये रस्ते, सरकारी जमिनीमध्ये वृक्षारोपण, बांध, ग्राम पंचायत रोपवाटिकासह अनेक कामांचा समावेश आहे. मात्र ही सर्व कामे केवळ कागदोपत्रीच सुरू आहेत. या योजनांतर्गत काम करणाऱ्या मजूरांना वेळेवर मजूरी मिळत नसल्यान एकदा काम करणारा मजूर पुन्हा काम करण्यास धजावत नाही. परिणामी या योजनेंतर्गत काम करणारे कंत्राटदार हे यंत्राच्या सहाय्याने काम करीत आहेत. यामुळे अधिकारी व पदाधिकारीच संगनमताने या योजनेचा बट्याबोळ करीत आहेत. तालुकास्तरावर या योजनांतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, त्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत तालुक्यात अनेक कामे करण्यात येत असले तरी या योजनांतर्गत विहीरींचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यापासून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना रसद पुरविता पुरविता शेतकऱ्यांकडे फक्त ४० ते ५० टक्के रक्कम शिल्लक राहते. तर या अधिकारी पदाधिकाऱ्यांना रसद पुरविली नाही. तर त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करीत त्यांना लाभ दिल्या जात नाही. जवळपास ७० टक्केच्यावर को कागदोपत्रीच करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमुळे रोजगारांना काम मिळण्याऐवजी या योजनेतून अधिकारी व पदाधिकारीच मालामाल होत असल्याचे जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
आजमितीला जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे जवळपास ८० टक्के बंद आहेत. गोरगरीबांना कामाची आवश्यकता असताना जिल्ह्यात या योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे बंद असल्याने जिल्ह्यातील युवक वर्ग कामाच्या शोधात शहरच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाला त्वरीत प्रारंभ करण्याची मागणी जिल्ह्यातील मजूरांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)