रस्त्याच्या कामाचे फलक झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:29+5:30
गोरेगाव-गोंदिया या मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.या कामाची एकूण किमत ही ८५ कोटी रुपये असून हे काम दीड वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र काम सुरू होऊन १३ महिन्याचा कालावधी लोटला असतांना या रस्त्याचे अर्धे सुध्दा काम झाले नाही.

रस्त्याच्या कामाचे फलक झाले गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गोरेगाव-गोंदिया रस्ता सिमेंटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र कंत्राटदाराने सदर रस्त्याचे काम करतांना नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसविले आहे. ज्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्याचा संपूर्ण तपशिल दर्शविणाऱ्या माहितीचा फलक कामाच्या ठिकाणी लावण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र तो फलक देखील गायब आहे.
गोरेगाव-गोंदिया या मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.या कामाची एकूण किमत ही ८५ कोटी रुपये असून हे काम दीड वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र काम सुरू होऊन १३ महिन्याचा कालावधी लोटला असतांना या रस्त्याचे अर्धे सुध्दा काम झाले नाही. त्यामुळे दिलेल्या कालावधीत काम पूर्ण होण्याची शक्यता फार कमी आहे.
विशेष म्हणजे कंत्राटदाराने या रस्त्याचे काम करीत असताना टप्प्या टप्प्याने काम करण्याची गरज होती. तसेच एका बाजुने वाहतुकीसाठी रस्ता सुरू ठेवण्याची गरज होती. मात्र तसे न करता संपूर्ण रस्त्याचे काम सुरू केल्याने वाहन चालकांना खड्डयातून वाहन चालावावी लागत आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाले आहे.त्यातून वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाल्याने अपघाताच्या संख्येत सुध्दा वाढ झाली आहे.
गोरेगाव-गोंदिया हे अर्ध्या तासाचे अंतर पार करण्यासाठी आता एक तासाचा कालावधी लागत असून वाहनांचे नुकसान होत आहे. तर कंत्राटदाराने वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली नसल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्यांचे हाल होत आहे. याबाबत ओरड वाढली असताना संबंधित कंत्राटदाराने अद्यापही कुठलीच दखल घेतली नाही.
६ महिन्यात काम पूर्ण कसे होणार?
गोरेगाव-गोंदिया रस्ता सिमेंटीकरणाचे काम हे दीड वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र आता १३ महिन्याचा कालावधी लोटला असून केवळ पाच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पाच महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे बोलल्या जाते.