तालुका मुख्यालयाचे रस्ते अंधारातच
By Admin | Updated: November 18, 2015 01:52 IST2015-11-18T01:52:24+5:302015-11-18T01:52:24+5:30
सालेकसा हे तालुका मुख्यालयाचे स्थळ असूनसुध्दा येथील जवळपास सर्वच रस्ते व चौक रात्रभर अंधारात असतात.

तालुका मुख्यालयाचे रस्ते अंधारातच
वाली कोणीच नाही : प्रशासकांचे दुर्लक्ष
सालेकसा : सालेकसा हे तालुका मुख्यालयाचे स्थळ असूनसुध्दा येथील जवळपास सर्वच रस्ते व चौक रात्रभर अंधारात असतात. त्यामुळे येथे रात्री बेरात्री ये-जा करणाऱ्या लोकांना त्रास तर होतोच, तसेच नेहमी धोक्याची शक्यता असते.
आदिवासी, नक्षलग्रस्त व मागासलेला तालुका म्हणून सालेकसाची सर्वत्र ओळख आहे. या तालुक्यात मागासलेले लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असून येथे सोमवारला आठवडी बाजार भरत असतो. तो बाजार रात्रीपर्यंत चालतो. त्यामुळे बाजारात येणाऱ्या ग्राहकांना तसेच दुकानदारांना विद्युत खांबावरील दिव्यांचा लाभ मिळत नाही. कारण येथील रस्त्यावरील खांबावर एक तर पथदिवे नाही किंवा काही ठिकाणी आहेत ते बंद पडून आहेत. त्यामुळे रस्त्यावर किंवा चौकात सर्वत्र अंधार पसरेला असतो.
सालेकसा हे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असून येथे रेल्वे स्टेशनची सोय आहे. या रेल्वेस्टेशनवर सर्व लोकल गाड्या तसेच शालीग्राम एक्सप्रेस आणि छत्तीसगड एक्सप्रेस या गाड्यांचा सुध्दा थांबा आहे.
त्यामुळे या रेल्वे स्टेशनवरून २४ तास रेल्वे प्रवाशांचा ये-जा सुरू असते. ते रेल्वे प्रवासी रात्री-बेरात्री सुध्दा ये-जा करतात. परंतु रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्रीला भयमुक्त वातावरण निर्माण होते. रस्त्यावरून चालत असताना काही खासगी दुकानदारान्ांी लावलेले दिवे थोडा दिलासा देणारे ठरतात.
सालेकसावरून राज्य महामार्ग क्रमांक २४९ गेला असून हा मार्ग महाराष्ट्राला छत्तीसगड राज्याशी जोडण्याचे काम करतो. तसेच उत्तरेकडे मध्यप्रदेशला जोडतो. त्यामुळे या मार्गावरून २४ तास सतत वाहने चालतात. परंतु तालुक्याचे ठिकाण असताना येथे पथदिवे नसल्याने अनेक अपघात सुध्दा घडतात. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी पथदिवे व्यवस्थीत असणे आवश्यक आहे. सध्या नगर पंचायतचे काम थंडबस्त्यात असून प्रशासकांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)