श्रमदानातून केली रस्त्याची दुरूस्ती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:01+5:302021-07-31T04:29:01+5:30
गोंदिया : ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही त्यांच्याकडून काहीच न झाल्याने अखेर नागरिकांनी श्रमदानातूनच रस्त्याची दुरूस्ती करून स्वत:ची सोय ...

श्रमदानातून केली रस्त्याची दुरूस्ती ()
गोंदिया : ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही त्यांच्याकडून काहीच न झाल्याने अखेर नागरिकांनी श्रमदानातूनच रस्त्याची दुरूस्ती करून स्वत:ची सोय करून घेतली. लगतच्या ग्राम कारंजा येथील समर्थ कॉलनीतला हा प्रकार असून, कॉलनीवासीयांनी कुणाच्याही भरवशावर न राहण्याचा एक संदेशच यातून दिला आहे.
कारंजा येथील राजाभोज समर्थ कॉलनी ही मागील १५ वर्षांपासून वसली आहे. आतापर्यंत या कॉलनीकडे कुणीही लक्ष दिले नाही. परिणामी येथे रस्ते, नाली व पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याने कॉलनीवासीयांना खूपच त्रास सहान करावा लागत आहे. पावसाळ्यात सर्वत्र चिखल होत असल्याने कॉलनीवासीयांना घराबाहेर पडणे अवघड होत आहे. कवलेवाडा रोड ते राजाभोज चौक समर्थ कॉलनीत जाण्याकरिता रस्ताच नसून, खड्ड्यांमुळे कॉलनीवासीयांना ये-जा करताना जीव मुठीतच घ्यावा लागतो. कॉलनीवासीयांनी ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना कित्येकदा रस्ता बांधकामासाठी निवेदन दिले. तरी आतापर्यंत कोणीही कॉलनीकडे ढुंकूनही बघितले नाही. केवळ आश्वासन दिले. अशात कॉलनीवासीयांनी पावसाळा बघता श्रमदानातून रस्त्यावरील ख़ड्ड्यांमध्ये दगड, विटा, रेती व मलमा टाकून खड्डे भरले व रस्ता ये-जा करण्याच्या सोयीचा केला. या श्रमदानात पोलीस हवालदार हॅवींद्र बडोले, मेजर रवींद्र पारधी, राजू शिंदे, शिवकुमार नागपुरे, आनंद पटले यांच्यासह अन्य कॉलनीवासीयांनी सहभाग घेतला.