जड वाहनांमुळे रस्ते खड्ड्यात
By Admin | Updated: February 7, 2016 02:38 IST2016-02-07T02:38:18+5:302016-02-07T02:38:18+5:30
प्रशासनाकडून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होत असतांनाच दुसरीकडे राष्ट्रीय परमीट असलेले ओव्हरलोड ट्रक ग्रामीण भागातील मार्गाने जात असल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे.

जड वाहनांमुळे रस्ते खड्ड्यात
मकरधोकडा मार्गाची दुरवस्था : टोल वाचविण्याचा ट्रकचालकांचा प्रयत्न
देवरी : प्रशासनाकडून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होत असतांनाच दुसरीकडे राष्ट्रीय परमीट असलेले ओव्हरलोड ट्रक ग्रामीण भागातील मार्गाने जात असल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारल्या जात आहे.
महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सिरपूर येथे सरकारने कोट्यवधी रूपये खर्च करून आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मित सीमा तपासणी नाक्याची निर्मिती केली. जवळपास दोन वर्षापूर्वी पासून निर्माण झालेल्या या सीमा नाक्याच्या अगदी जवळून गैरमार्गाने सिरपूर, पदमपूर, मकरधोकडा या मार्गाने सर्रास ओव्हरलोड ट्रकांची ये-जा सुरू आहे. ज्यामुळे जि.प.विभागामार्फत निर्माण करण्यात आलेल्या या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून ग्रामीण जनतेला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या डांबरीकरण रस्त्याची गिट्टी पुर्णपणे उखडली आहे. धुळामुळे लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. दुसरीकडे या मार्गावरील प्रत्येक गावातील काही ग्रामीण प्रती ट्रक १०० रुपये वसूली करून ट्रकांना जाण्याकरीता मार्ग मोकळा करुन देत आहेत. या मार्गावर दिवसापेक्षा रात्रीला ट्रकांची सारखी वर्दळ असते. यामुळे गावागावात अशांततेचे वातावरण निर्माण होत असल्यांचे दिसून येत आहे. सिरपूर, पदमपूर, मकरधोकडा हा ३ किमीचा जि.प.विभागाचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. हाच प्रकार ककोडी, चिचगड, देवरी मार्गावर बघायला मिळतो. या ओव्हरलोड ट्रकांमुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या देवरी व चिचगडच्या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ओव्हरलोड वाहनांची गैरमार्गाने होत असलेली वाहतुक बघायला प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी ककोडी-चिचगड-देवरी व सिरपूर-मकरधोकडा-पदमपूर या मार्गावर ३ फेब्रुवारी भेट दिली. रस्त्याची अवस्था बघून व ओव्हरलोड वाहतुक बघून ते अवाक झाले. यावेळी त्यांना या मार्गावर दोन ओव्हरलोड ट्रक ओळखले. त्यावर त्यांनी कारवाई सुध्दा केली.
विशेष म्हणजे सिरपूरच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामीण रस्त्याची होत असलेल्या दुरावस्थेची तक्रार जिल्हाधिकारी गोंदिया तसेच पोलीस अधीक्षक यांना केली होती. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. जिल्ह्याच्या सुरक्षा समितीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या गैरमार्गाने होत असलेल्या वाहतुकीमुळे प्रतिदिवशी लाखो रुपयाचे राजस्व बुडत आहे. परंतु प्रशासन गप्त का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकार शरद जिचकार यांना विचारले असता ते म्हणाले की ग्रामीण मार्गाने होत असलेली ओव्हरलोड वाहतुक नियमबाह्य आहे. या दोन्ही मार्गाची पाहणी केली असता अवैध वाहतुक होत असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी ग्रामीण सुध्दा रात्रभर जागून ट्रक थांबवून त्यांचेकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनात आले आहे. आमच्या विभागाचे फिरते पथक ज्यावेळी कारवाईला येते त्यावेळी ट्रकचालकांना माहिती मिळताच ते ट्रकांना छत्तीसगड मध्येच थांबवून देतात. परंतु यावर योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जि.प. विभागाचा रस्ता खराब होत असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.