पूर्णावधी लोटूनही तो रस्ता ब्रम्हचारीच ! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST2021-07-31T04:28:50+5:302021-07-31T04:28:50+5:30

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी-रेंगेपार- शेंडा या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम गेल्या पावणे तीन वर्षांपासून सुरू आहे. निकृष्ट ...

That road is celibate even after full time! () | पूर्णावधी लोटूनही तो रस्ता ब्रम्हचारीच ! ()

पूर्णावधी लोटूनही तो रस्ता ब्रम्हचारीच ! ()

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी-रेंगेपार- शेंडा या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम गेल्या पावणे तीन वर्षांपासून सुरू आहे. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची जनतेची तक्रार आहे. मात्र एका बड्या राजकारण्याशी संबंधित कंपनीला हे काम असल्याने एकही अधिकारी ढुंकून पाहात नाही. दिलेल्या मुदतीत रस्त्याचे बांधकाम तर पूर्ण झाले नाहीच याउलट पाच कोटींच्या अतिरिक्त बाबीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्वतंत्र अधिकारी नेमून या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी माजी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सडक अर्जुनी पासून १० किमी अंतरावर शेंडा हे गाव आहे. यादरम्यान प्रजिमा क्र. २९ वर सहा किमी रस्ता बांधकामासाठी २८ कोटी ७३ लक्ष ८७ हजार १०२ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक होते. याचा करारनामा २२ कोटी ४ लक्ष ६० हजार ६६५ रुपयांमध्ये नागपूरच्या अताशा आशीर्वाद बिल्डर्स यांना १३ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला. लगेच दुसऱ्या दिवशी कार्यारंभ आदेश देण्यात आला. रस्ता बांधकाम पूर्ण होण्याची मुदत १३ नोव्हेंबर २०२० ही होती. अगदी कार्यारंभ झाल्यापासूनच हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची जनता व लोकप्रतिनिधींची तक्रार होती. मात्र हे कंत्राट गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या राजकारणाशी संबंधित नागपूरच्या एका बड्या राजकारण्याशी निगडित बांधकाम कंपनीला आहे. यामुळेच कुणीही अधिकारी जनतेच्या तक्रारी व रस्त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जुन्या मंजूर अंदाजपत्रकात काँक्रिट रस्त्याची जाडी ४५० मिमी होती. कंत्राटदाराने राजकीय बळाचा वापर करून नावीन्यपूर्ण बाब म्हणून व्हाइट टॉपिंग काँक्रिट या संकल्पनेनुसार २५० मिमी एवढी तयार केली. सदर रस्त्याची जाडी २०० मिमी कमी करून पावसाळ्यात घरात पाणी शिरू नये हे चुकीचे कारण दर्शवून अतिरिक्त बाबीचा प्रस्ताव दाखल केला. या ५ कोटी ८ लक्ष ५९ हजार ९३९ रुपयांच्या अतिरिक्त बाबीच्या प्रस्तावास नागपूरच्या साबां (प्रादेशिक) विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी १९ जानेवारी रोजी मान्यता दिली. विशेष उल्लेखनीय म्हणजे घरात पाणी शिरते अशी कुणाचीही तक्रार नव्हती. कंत्राटदाराने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हे केल्याचा आरोप आहे.

...........

५० टक्केही काम पूर्ण नाही

हे बांधकाम सुमारे पावणे तीन वर्षांपासून सुरू आहे. यावर कुठल्याच प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन नाही. हे बांधकाम गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र २ यांचे अखत्यारित सुरू आहे. बांधकामाची गुणवत्ता नाही. काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे. कासवानेही पावणे तीन वर्षांत हा सहा किमीचा प्रवास पूर्ण केला असता मात्र एवढ्या कालावधीत रस्त्याचे अद्याप ५० टक्केही काम पूर्ण होऊ शकले नाही. कंत्राटदाराच्या या कासव गतीचा जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने हा रस्ता पूर्ण झाला नाही तर, जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. राज्य सरकारने चौकशी समिती नेमून या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी परशुरामकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली आहे.

300721\img-20210730-wa0002.jpg

हाच तो अपूर्णअवस्थेत असलेला सडक अर्जुनी-रेंगेपार-शेंडा रस्ता

Web Title: That road is celibate even after full time! ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.