जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दुर्दशा
By Admin | Updated: December 8, 2014 22:37 IST2014-12-08T22:37:37+5:302014-12-08T22:37:37+5:30
तालुक्यातील प्रमुख सात-आठ गावाला जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त झाले आहेत. या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालकाला मोठी कसरत करावी लागते.

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दुर्दशा
आमगाव : तालुक्यातील प्रमुख सात-आठ गावाला जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त झाले आहेत. या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालकाला मोठी कसरत करावी लागते. निधी नाहीच्या नावावर हात वर करून अधिकारी व नेते वेळकाढूपणाचे धोरण अवलंबवित असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.
आमगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे बाहेर गावावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. वेळेवर जे मिळेल त्या साधनाने येऊन काम करून प्रत्येक जन निघून जातात. यात मोठी गैरसोय शाळकरी मुलांची होत आहे. मात्र प्रशासन व स्थानिक नेते मुकबधीर होऊन बसले आहेत. काही गावांना जाणारे मार्ग दहा ते वीस वर्षांपासून दुरूस्ती करणापासून वंचित आहेत. फक्त निधी नाही, नियोजनाअभावी कामे थांबली आहेत, अशी बतावणी करून वेळकाढूपणाचे धोरण सुरू आहे.
अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद गोंदिया येथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मग सतत ५ ते १० वर्षांपासून तालुक्याला रस्ते दुरूस्तीसाठी निधी शासनाकडून का पाप्त झाला नाही? किंवा निधीसाठी पाठपुरावा कधीच का केला गेला नाही किंवा निधी आला तर तालुक्यातील रस्त्यावर अन्याय का झाला, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. नागरिकांना नगरात येताना जो त्रास होतो त्याचा पाठपुरावा अजूनपर्यंत झाला नाही. आमगाव, कुंभारटोली, बिर्सी, जामखारी, तिगाव, कोपीटोला पुढे मांडोबाई, आमगाव, किडंगीपार, शिवणी, चिरचाळबांध, सितेपार, भजेपार, कालीमाटी-सुपलीपार, मोहगाव कार्तुली, कालीमाटी ते मुंडीपार, भोसा, करंजी, आमगाव, शंभुटोला, महारीटोला, सरकारटोला, ननसरीपुढे मुंडीपार अशाप्रकारे जवळपास २५ ते ३० गावांना जाणाऱ्या जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे निवासस्थान आहे. जिल्हा परिषद सदस्य टुंडीलाल कटरे, योगेश्वरी पटले, उषा हर्षे, संगीता दोनोडे यांच्या जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणारे रस्ते मोठ्या प्रमाणात खड्ड्यांनी भरून गेले आहेत. फक्त जिल्हा परिषदेचे कोणते लाभ आपणाला किंवा आपल्या चेलेचपाट्यांना कसे मिळतील, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहेत. बंधारे, खळीकरण, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम मिळविण्याकरिता अनेक जि.प. सदस्य व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या क्षेत्राचे कामे मिळतात. मात्र त्यांच्या क्षेत्रातील रस्त्यांचे डांबरीकरण होण्याकरिता ठोस उपाय अजूनपर्यंत झाले नाही. फक्त नगरातील कामठा चौकात आमगाव, शंभुटोला, ननसरी मार्गांचे डांबरीकरण व्हावे, याकरिता सर्वदलीय उपोषण करण्यात आले. मात्र तेथेसुध्दा काम पूर्णत्वास अजूनपर्यंत गेले नाही.
एकंदरीत आज सत्ता संपूर्ण एका पक्षाची आहे. एक हाती सत्ता असल्यामुळे आता तरी तालुक्यातील ज्या प्रमुख गावांना जाणाऱ्या मार्गाची जी दुर्दशा झाली आहे, त्यांचे डांबरीकरण अत्यंत गरजेचे आहे. जवळच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत असल्याने आचार संहितेचा फटका नाकारता येणार नाही. त्यामुळे लवकर डांबरीकरण करणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)