परतीच्या पावसाने १९ हजार हेक्टरमधील धानपीक बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे १९ हजार ३८७ हेक्टरमधील धानपिकाचे ३३ टक्के पेक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे १९ हजार ३८७ हेक्टरमधील धानपिकाचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. परिणामी याचा फटका जिल्ह्यातील ३२ हजार ७९८ शेतकऱ्यांना बसला असून या संबंधिचा अहवाल कृषी व महसूल विभागाने शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून आता शासनाकडून नुकसान भरपाईसाठी कोणता निकष लावला जातो याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात यंदा १ लाख ९६ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली. सुरूवातीला पाऊस लांबल्याने पेरण्या आणि परिणामी रोवण्या खोळंबल्या होत्या. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस झाल्याने आणि पावसाने सरासरी गाठल्याने धानपिकांना संजीवनी मिळाली. धानपिकाला अनुकुल वातावरण मिळाल्याने धानपिकाची चांगली वाढ झाली. त्यामुळे यंदा खरीपातील धानाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने ५० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त करीत नियोजन केले होते. मात्र ऐन हलके धान निघण्याच्या मार्गावर असताना आॅक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास १० हजार हेक्टरमधील धानाची कापणी पूर्ण झाली होती. कापणी केलेला धान बांध्यामध्ये पडून होता. दरम्यान परतीच्या पाऊस जोरदार बरसल्याने धानाच्या कडपा ओल्या होऊन काही प्रमाणात धानाला अंकुर फुटले तर मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला. काही शेतकºयांना तर केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण झाले आहे.
त्यामुळे शेतकºयांच्या तोंडचा घास परतीच्या पावसाने हिरावून नेल्याने शेतकºयांना पुन्हा अस्मानी संकटाला तोंड देण्याची वेळ आली. परतीच्या पावसाने धान पिकांचे नुकसान झाल्याची शेतकºयांची ओरड वाढल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाला दिले. त्यानंतर कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे सर्वेक्षण केले.
यात १९ हजार ३८७ हेक्टरमधील धान पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असून यामुळे ३२ हजार ७९८ शेतकरी बाधीत झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे बुधवारी पाठविल्याची माहिती आहे.
पीक विमा कंपनीची माहिती गुलदस्त्यात
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ७० हजारावर शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढला. परतीच्या पावसामुळे धानपिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक विमाधारक शेतकºयांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले. मात्र या अर्जांची माहिती देण्यास आणि किती शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र ठरु शकतील याची माहिती पीक विमा कंपनीने गुलदस्त्यात ठेवल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
नुकसानीकडे लागले लक्ष
राज्यात सध्या राष्टÑपती राजवट लागू असल्याने परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासंदर्भात निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कृषी आणि महसूल विभागाने युध्द पातळीवर नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर केला असला तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नुकसानीचा निकष काय?
पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक धानपिकांचे नुकसान झाले असल्यास असे शेतकरी नुकसान भरपाई पात्र ठरतात. मात्र ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला नाही त्या शेतकºयांना नुकसान भरपाई देतांना शासन नेमका कोणता निकष लावते, हेक्टरी किती रुपये नुकसान भरपाई जाहीर करते याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.