वाईट गोष्टींना लगाम स्वत:पासूनच घाला
By Admin | Updated: August 12, 2015 02:16 IST2015-08-12T02:16:10+5:302015-08-12T02:16:10+5:30
तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पाहिजे तसा तरुणाचा ज्ञानार्जनाकडे कल नाही. उच्चपणाचा

वाईट गोष्टींना लगाम स्वत:पासूनच घाला
लोकमत परिचर्चा : युवा वर्गाने दाखविले जागरूक आणि सामाजिक भान
गोंदिया : तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पाहिजे तसा तरुणाचा ज्ञानार्जनाकडे कल नाही. उच्चपणाचा आव दाखवून समाजात वावरणाऱ्या तरुणांची नैतिकता ढासळत आहे. याचे कारण आजच्या काळात तरुणांमध्ये संस्कारक्षम अशी वातावरण निर्मिती नाही. आई-वडिलांकडून मुलांना ध्येयपुर्तीचे धडे दिले जात नसल्यामुळे तरुण भरकटला आहे. जगाकडे पाहताना प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पण युवा वर्गाने भरकटून जाणे योग्य नाही. स्वत:वर लगाम घालण्याची आणि चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासून केल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते, असा सूर युवक-युवतींनी लावला.
लोकमत कार्यालयात मंगळवारी आयोजित परिचर्चेत हे महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षणासोबतच स्पर्धा परिक्षेत कसा टिकाव धरता येईल यासाठी सुरुवातीपासूनच शाळेत शिकवले गेले पाहिजे. आधी शाळांमध्ये देशभक्तीचे धडे दिले जात होते. परंतू आता देशभक्ती सोडा इतिहासही आपण विसरत चालल्याची खंत तरुणांनी व शिक्षकांनी व्यक्त केली.
सुरुवातीपासून विद्यार्थी वर्गाला संस्कारमय व देशभक्तीची भावना जागृत करणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. तरुणांनी शिक्षणाप्रती प्रामाणिकता दाखवून चांगल्या गुणांनी पुढे आले तरी त्यांना येथील व्यवस्थेपुढे हतबल व्हावे लागते. प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे स्वत: आपल्यात व्यवसाईक अभ्यासक्रमाकडे वळले पाहिजे. आई-वडिलांनी आपल्या पालकांवर आपल्या ईच्छा लादू नये. त्यांना त्यांच्या ईच्छेप्रमाणे त्या-त्या क्षेत्रात जाऊ द्यावे. शिक्षणाची बाजारीकरण झाले असून शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये ही व भाषेमध्येही दुजाभाव केल्या जातो. नोकरी व पैशांमुळे गुणवत्तेची कदर राहिली नाही.
शिक्षण महत्वाचे साधन असले तरी आज शिक्षणाला पैशापुढे नतमस्तक व्हावे लागते. शिक्षणामुळे विवेकवादी व्यक्ती घडतो. या व्यवस्थेने गुणवत्तेला स्तब्ध केले. समाजात वावरताना अनेक तरुणांना समस्यांची जाणीव आहे. परंतु कळते पण वळत नाही या म्हणीप्रमाणे तरुणांनी समाजातील समस्यांकडे लक्षपुर्व दुर्लक्ष केले. समाज सेवेचे किंवा देशसेवेचे व्रत अंगीकारावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु आई-वडिलांना वाटतो भगतसिंगाने जन्म घ्यावा, परंतु तो माझ्या घरी नाही शेजारच्या घरी व्हावा या वृत्तीमुळे आज देशभक्ती तरुणांमधून कमी होत असल्याचे ते म्हणाले.
तरुणांना सामाजिक नेतृत्व नसल्यामुळे आज तरुण वर्ग भरकटला जात असून देशाची मोठी हाणी होत आहे. आजचा तरुण व्यवसानांना फॅशन करुन बसला आहे. आपण व्यसन केले तर आपली मोजणी उच्चभ्रू लोकांमध्ये होते असा गैरसमज आज नवतरुणांना होत आहे. जो सिगारेट ओढत नाही, दारु पीत नाही अशा तरुणांना ‘ओल्ड फॅशन’चा तरुण म्हणून त्याची टिंगल उडवली जाते. परंतु जिवनाचे सार्थक करण्यासाठी व्यसनांना दूर ठेवणारा तरुण देशाचे उज्वल भविष्य घडवू शकतो. हे आज तरुण विसरला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा बचाव करण्यासाठी वृक्ष संवर्धनाकडे तरुणांनी लक्ष घालून समाज सेवेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरणामुळे व मित्रांच्या सहवासामुळे तरुण व्यसनाकडे वळतो. त्यामुळे आई वडिलांनी मुलांच्या सहवासाकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे.
आज स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात आहे. परंतु बोटावर मोजण्याइतके या फोनचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात. परंतु या स्मार्ट फोनचा वापर वाईट कामासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. वॉट्स अॅप वर ग्रुपमध्ये चॅटिंग करताना त्या ग्रुपमध्ये त्या तरुणांच्या आई-वडिलांनाही जोडले तर या ग्रुपवर चुकीचे संदेश टाकले जाणार नाही. व तरुणांना दिशाहिन करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही.
या परिचर्चेत नमाद महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.बबन मेश्राम, गोंदिया पब्लिक स्कूलच्या शिक्षिका वर्षा भांडारकर, नुतन खोब्रागडे, निखिल बोरकर, करुणा कडव, भारत टेंभुर्णेकर, वैभव शहारे, शाम नागज्योती, गुणेश्वर बिजेवार, भुपेंद्र गजभिये, अक्षय चव्हाण, प्रतिक सोनवाने आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)