अग्निशमन विभागाचा कारभार प्रभारावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 21:35 IST2017-11-26T21:34:53+5:302017-11-26T21:35:59+5:30
शहरातील महत्त्वपूर्ण अशा अग्निशमन विभागाचा कारभार मागील पाच वर्षांपासून प्रभारावर चालत आहे. सन २०१२ पासूनचा हा प्रकार असून सध्या विभागातील लिडींग फायरमनकडे विभागाचा प्रभार देण्यात आला आहे.

अग्निशमन विभागाचा कारभार प्रभारावरच
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील महत्त्वपूर्ण अशा अग्निशमन विभागाचा कारभार मागील पाच वर्षांपासून प्रभारावर चालत आहे. सन २०१२ पासूनचा हा प्रकार असून सध्या विभागातील लिडींग फायरमनकडे विभागाचा प्रभार देण्यात आला आहे. यातून नगर परिषदेतील कारभाराची प्रचिती येते. नगर परिषदेकडून या विषयावर पाठपुरावा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र मागील पाच वर्षात या विषयात नगर परिषदेच्या हाती काहीच लागले नाही हे विशेष.
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभाग म्हणजे एक महत्वपूर्ण व जबाबदार विभाग आहे. आगीची एखादी घटना घडल्यास हा विभाग किती महत्वाचा आहे याची प्रचिती येते. मात्र गोंदिया शहराची कमनशिबीच म्हणावी लागेल की एवढ्या महत्वाच्या या विभागाला प्रभाराचे ग्रहण लागले आहे. मागील पाच वर्षांपासून या विभागाला मुख्य अग्निशमन अधिकारी लाभलेले नाही. परिणामी विभागातील कर्मचाºयांना त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार प्रभार देण्याचे काम सुरू आहे.
सन २०१२ मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी जी.एच.ब्राम्हणकर सेवानिवृत्त झाले. तेव्हापासूनच अग्निशमन विभागाला प्रभाराचे ग्रहण लागले आहे. ब्राम्हणकर गेल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकाºयांचा प्रभार प्रकाश कापसे यांच्याकडे देण्यात आला होता. आता मात्र कापसे ३१ आॅक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्याने पुन्हा रिक्त झालेली ही खुर्ची आता लिडींग फायरमन सी.एल.पटले यांच्याकडे देण्यात आली आहे. मागील पाच वर्षांपासून अग्निशमन विभागात हा प्रकार सुरू आहे.
नगर परिषद प्रशासनाकडून या विषयाला घेऊन पाठपुरावा केला जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र यात वास्तवीकता किती हेच कळत नाही. कारण, सन २०१२ पासून प्रयत्न सुरू असूनही एवढ्या महत्त्वपूर्ण विषयाकडे शासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने एकतर नगर परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी कमी पडत असतील. नाही तर शासनाला गोंदिया शहर व शहरातील जनतेशी काहीच घेणे नाही असे समजावे अशा प्रतिक्रिया आता शहरवासी देत आहेत. त्यामुळे आता आणखी किती काळ येथील अग्निशमन विभागाचा कारभार प्रभारावर चालतो हे बघायचे आहे.
हॉटेल बिंदलच्या घटनेने कारभार उजेडात
शहरातील हॉटेल बिंदलमध्ये आग लागल्याची घटना अत्यंत दुर्देवी घडली. याप्रसंगी अदानीच्या अग्निशामकांचा मोठा आधार झाला होता. येथील अग्निशमन विभागानेही पाहिजे तसे प्रयत्न केले होते. मात्र या घटनेने येथील अग्निशमन विभाग किती तत्पर आहे हे उजेडात आणले होते. विभागाकडे जबाबदार प्रमुखच नसल्याने त्या विभागाचा कारभार कसा चालणार हे सांगायची गोष्ट नाही.
मुख्य अग्निशमन अधिकाºयांचे पद भरावे यासाठी सप्टेंबर महिन्यापासून दोन वेळा प्रधान सचिवांसोबत बैठका झाल्या आहेत. यात अतिरिक्त पदे भरण्याचीही मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र अग्निशमन संचालनालयाच्या संचालकांनीही ८० पदे मंजूर करण्याबाबतचे शिफारस पत्र शासनाकडे पाठविले आहे. आमच्याकडूनही पाठपुरावा सुरू आहे.
- चंदन पाटील
मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया.