टेकाबेदरवासीयांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST2021-07-30T04:31:01+5:302021-07-30T04:31:01+5:30
लोहारा : देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंडकेपार-गोटाबोडी अंतर्गत मौजा टेकाबेदर येथे मागील २ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण ...

टेकाबेदरवासीयांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती ()
लोहारा : देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंडकेपार-गोटाबोडी अंतर्गत मौजा टेकाबेदर येथे मागील २ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सन १९७९ मध्ये गावात प्रथम बोअरवेल खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या बोअरवेलला भरपूर पाणी लागले होते. नंतर काही काळात ४ बोअरवेल खोदून हातपंप बसविण्यात आले. असे एकूण ५ बोअरवेल खोदण्यात आले. पंरतु यापैकी ३ बाेअरवेल निकामी आहेत. एकाला खूपच कमी पाणी असल्याने ग्रामस्थानां भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सन १९९८-९९ या कालावधीत गावात नळयोजना अंमलात आली. तेव्हा गावातील प्रथम बोअरवेलने पाण्याचा पुरवठा पाणी टाकीत करून गावात नियमित पाणी पुरविले जात होते. त्या सर्व बोअरवेलची खोली २०० फूट आहे. सन १९८१ ते २०१९ पर्यंत गावाला एकाच बोअरवेलने पाणी पुरविले गेले. या काळात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासली नाही. परंतु सन २०१९ पासून गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा होणाऱ्या बोअरवेलजवळ गावातील एकाने स्वतःच्या मालकीची ३५० फूट खोल बोअरवेल खोदली आहे. तेव्हापासून पाणी टाकीला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बोअरवेलला पाणी कमी झाल्याने संपूर्ण टेकाबेदर गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईची तक्रार घेऊन गावकऱ्यांनी प्रथमत: पिंडकेपार येथील गट ग्रामपंचायतकडे धाव घेतली. परंतु ग्रामपंचायतने समस्येकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून गट विकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. यावर तहसीलदारांनी पाणीपुरवठा विभागाचे संदीप पवार यांना मौका चौकशी करण्यास सांगितले. संदीप पवार यांनी टेकाबेदर गावाला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्यांनी पाणी टाकी लगत ४०-५० फूट अंतरावर असलेल्या त्या शेतकऱ्याचा पंप बंद करायला सांगितले. पण त्यांनी तो पंप बंद केला नाही. या विषयासंदर्भात उपविभागीय अभियंता, उपविभागीय वीज कार्यालयालाही गावकऱ्यांनी निवेदन दिले. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने पाणी टचांईचा प्रश्न सुटला नाही.
....................
काही लोकांमुळे गावकऱ्यांना त्रास
निसर्गाने नाही तर गावातील १-२ लोकांनी संपूर्ण गावाला संकटात टाकले असून आजघडीला पाण्याच्या शोधात गावकरी १-२ किलोमीटर अंतरावरून शेतातल्या बोअरवेलचे पाणी पिण्याकरिता आणतात. पण ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची सुद्धा जाणीव गावकऱ्यांना नाही. अशात पाणी संकटांचा सामना गावकरी भर पावसाळ्यातही करीत आहेत. योग्य ती चौकशी करून पाणी टंचाईची समस्या सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी अनेकदा स्थानिक ग्रामपंचायतसह तालुका व जिल्हा प्रशासनाकडे केली. पंरतु प्रशासन व लोकप्रतिनीधींच्या सततच्या वेळकाढू धोरणामुळे हा प्रश्न सुटला नाही. आता सोमवारी (दि.२६) गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.