आमगावचे रेणुकानगर चार महिन्यांपासून पाण्यात
By Admin | Updated: May 2, 2015 01:41 IST2015-05-02T01:41:49+5:302015-05-02T01:41:49+5:30
पाणी हे जीवन असते. त्याला विनाशापासून वाचवा, या पाटबंधारे विभागाच्या ब्रिदला तिलांजली देण्याचे काम आमगावचा पाटबंधारे विभाग करीत आहे.

आमगावचे रेणुकानगर चार महिन्यांपासून पाण्यात
आमगाव : पाणी हे जीवन असते. त्याला विनाशापासून वाचवा, या पाटबंधारे विभागाच्या ब्रिदला तिलांजली देण्याचे काम आमगावचा पाटबंधारे विभाग करीत आहे. मागील चार महिन्यापासून रबि पिकासाठी दिले जाणारे पाणी शेतीला मिळत नाही. उलट ते पाणी आमगावच्या रेणुकानगर, राजाभोज नगर व न्यायालयाच्या मागील भागात मागील चार महिन्यापासून वाहात आहे.
रबी पिकासाठी पाटबंधारे विभागाने मागील चार महिन्यापासून पाणी वाहात आहे. मागील चार महिन्यात कितीतरी पाणी वाहून गेले. या पाण्यामुळे या परिसरात घर बांधणाऱ्या लोकांचे सिमेंट खराब झाले. विहीरीतील पाणी खराब झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमगावच्या न्यायालयामागील भाग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहात आहे. रेणुकानगरातील लोकांना रस्त्याने जाणे कठीण झाले आहे. या नगरातील रस्ते कच्चे असल्यामुळे उन्हाळ्यातही गुडघाभर पाण्यातून तेथील लोकांना ये-जा करावी लागते. मागील चार महिन्यापासून वाया जाणाऱ्या पाण्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. पाटबंधारे विभागाचे कालवे अनेक ठिकाणातून भग्न असल्यामुळे कालव्यातील पाणी शेतीला न मिळता सरळ लोकवस्तीतून वाहात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात लोकांना चिखलातून ये-जा करावी लागते. त्रस्त झालेल्या लोकांनी वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा म्हणून लोकांनी पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले. तेथील शाखा अभियंता एफ.पी. राठोड यांना या वाहत्या पाण्याची माहिती दिल्यावर राठोड यांनी त्या नागरिकांश्ी अरेरावी करून तुम्ही शेतकऱ्यांना सांगा आम्ही काय करणार असा उलट प्रश्न नागरिकांना केला. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पाटबंधारे विभागाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. मागील चार महिन्यापासून पाटबंधारे विभागाच्या उदासिनतेमुळे लाखो रूपयाचे पाणी वाहून गेले आहे. शाखा अभियंत्यांना सांगूनही त्यांनी या प्रकराकडे लक्ष दिले नाही. परिणामी चार महिन्यापासून राजाभोज कॉलनी व रेणुका नगरातील लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाया गेलेल्या पाण्याचा भूर्दंड राठोड यांच्या खिशातून वसूल करावा, अशी मागणी चंद्रशेखर बोरसरे, डॉ. पाथोडे, जांभूळकर, रामटेके, मेश्राम, लांजेवार व नागवंशी यांनी केली आहे.