रिमझिम पावसात गणरायाचे आगमन
By Admin | Updated: September 18, 2015 01:31 IST2015-09-18T01:31:21+5:302015-09-18T01:31:21+5:30
गुरूवारी सकाळपासूनच बरसत असलेल्या रिमझिम पावसातही जिल्ह्यात गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन होऊन १० दिवसांकरिता प्रतिष्ठापणा करण्यात आली.

रिमझिम पावसात गणरायाचे आगमन
उत्साह कायम : ९९० सार्वजनिक मंडळांची श्रीची स्थापना
गोंदिया : गुरूवारी सकाळपासूनच बरसत असलेल्या रिमझिम पावसातही जिल्ह्यात गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन होऊन १० दिवसांकरिता प्रतिष्ठापणा करण्यात आली. भर पावसातही गणरायांना वाजतगाजत आणण्यासाठी तरूणाई उत्साहित दिसून आली. ढोल-ताश्यांच्या तालावर सार्वजनिक मंडळांनी गणरायाला मंडपापर्यंत आणून विराजमान केले. दोन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे उत्सवावर थोडाफार परिणाम जाणवणार असला तरी पावसाची नितांत गरज असल्याने आनंदाचे वातावरण बघावयास मिळत आहे.
राज्याचे आद्यदैवत गणरायांचा १० दिवसांचा उत्सव गोंदिया शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या थाटा-माटात साजरा केला जातो. सुमारे ९९० सार्वजनिक तर चार हजारांवर खाजगी गणेशमूर्तींची स्थापना यावेळी केली जात आहे. गणरायाच्या या उत्सवासाठी मागील महिनाभरापासून तयारी सुरू होती. गणेश मंडळांकडून मूर्ती व मंडप उभारण्यासाठी धावपळ सुरू होती. याशिवाय घराघरांत गणराय येणार असल्याने बालगोपालांपासून वृद्धांपर्यंत सर्वच गणपतीची वाट पाहात होते.
गुरूवारी (दि.१७) गणरायांच्या आगमनाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच सायकल, दुचाकी व चारचाकीतून लाडके गणराय भाविकांच्या घरी आणले जात होते. दुपारनंतर सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती आणण्यास वेग आला.
ढोल-ताशांच्या गजरात तरूण नाचत-गात व जयघोष करीत गणरायांना मंडपापर्यंत आणले जात होते. मात्र पावसामुळे डिजे आणि ढोलताशांना काहीसा लगाम लागल्याचे दिसून आले. पावसाचा थेंबही मूर्तीला लागणार नाही यासाठी प्लॅस्टिक कव्हरने झाकले जात होते. मात्र स्वत: तरुणांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. (शहर प्रतिनिधी)