वनकर्मचाऱ्यांकडून नियमांची व आदेशाची पायमल्ली
By Admin | Updated: May 21, 2015 01:01 IST2015-05-21T01:01:26+5:302015-05-21T01:01:26+5:30
वनविभागाकून जंगलातील लाकूड चोरी करण्याच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी जंगलव्याप्त परिसरातील गावा-गावात वनसमित्या तयार करून लाकूड चोरीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला.

वनकर्मचाऱ्यांकडून नियमांची व आदेशाची पायमल्ली
केशोरी परिसर : जळाऊ लाकडांचा ट्रॅक्टर वनकर्मचाऱ्यांच्या घरी
केशोरी : वनविभागाकून जंगलातील लाकूड चोरी करण्याच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी जंगलव्याप्त परिसरातील गावा-गावात वनसमित्या तयार करून लाकूड चोरीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आदिवासी कुटूंबाना गॅस कनेक्शन पुरवून सरपनासाठी लागणाऱ्या लाकडांचा उपयोग होऊ नये म्हणून उपाययोजना कार्यान्वित केल्या अर्थात या योजनांमुळे जंगलातील लाकूड चोरीचे प्रमाण निश्चितच कमी झाले असले तरीही वन कर्मचारीच नियमांची पायमल्ली करून वनमजुरांच्या सहकार्याने सरपणासाठी लागणारी लाकडे ट्रॅक्टरव्दारे आपल्या घरी बोलावित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुंपणच शेत खात असल्याचे यावरून दिसून येते.
सरपणासाठी लागणारे जलावू लाकुड आणि मौल्यवान लाकूड जंगलातून चोरी करण्याचा प्रमाणावर आळा बसण्यासाठी शासनाच्या वनविभागाकडून विविध उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जंगलव्याप्त भागातील गावा-गावात वनसमित्या निर्माण करून लाकुड चोरीवर नियंत्रण ठेवण्यास शासनाला यश आले. त्याच बरोबर आदिवासी कुटूंबाना गॅस कनेक्शन पुरवून दर महिन्याला सिलींडरचा पुरवठा करण्यामुळे निश्चितच जंगलातील लाकूड चोरी करण्यावर आळा बसला आहे. परंतु केशोरी परिसरातील वनकर्मचाऱ्यांनीच वनमजुरांच्या मार्फत ट्रॅक्टरव्दारे आपल्या घरी जलावू लाकडे आणण्याचे प्रकार सुरू आहे.
आदिवासी कुटूंबाना शासनाकडून कमी दरात दर महिन्याला मिळणाऱ्या गॅस सिलींडरचा उपयोग वनकर्मचारी घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिनस्त काम करत असणाऱ्या लहान कर्मचाऱ्यांना खाजगी कामे किंवा घरगुती कामे सांगू नये? असे शासनाने फर्मावली असतांना सुध्दा वनमजुरांकडून आपल्या घरी जलावू लाकडे पोहचविण्याचे कामे करवून घेतली जात आहेत. याला शासकीय काम म्हणता येईल काय? वनकर्मचाऱ्यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. तसेच इतर लोकांनी किंवा महिलांनी जंगलातून मोळीभर काड्या आणणे या कर्मचाऱ्यांना खपत नाही तर आपल्या घरी ट्रॅक्टरभर जलावू लाकडे आणण्याचा अधिकार यांना कोणी दिला. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन वनविभागाच्या नियमांची आदेशाची पायमल्ली करून अवहेलना करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)