कारवायांत घट; मात्र लाचखोरी थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST2021-07-30T04:31:23+5:302021-07-30T04:31:23+5:30

कपिल केकत गोंदिया : अगोदर आलेल्या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था हादरून गेली होती. त्यानंतर आता मागील वर्षापासून कोरोनाने अर्थव्यवस्थेचे वाटोळेच करून ...

Reduction in actions; But bribery will not stop | कारवायांत घट; मात्र लाचखोरी थांबेना

कारवायांत घट; मात्र लाचखोरी थांबेना

कपिल केकत

गोंदिया : अगोदर आलेल्या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था हादरून गेली होती. त्यानंतर आता मागील वर्षापासून कोरोनाने अर्थव्यवस्थेचे वाटोळेच करून टाकले आहे. कोरोनामुळे मागील वर्षापासून कित्येकांच्या हातचे रोजगार हिरावले गेले आहेत; तर कित्येक उद्योगधंदे बंद पडले असून काम देणाऱ्या हातांनाच आता काम मागण्याची वेळ आल्याचेही दिवस पाहावयास मिळत आहेत. लोकांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही लाचखोरांना मात्र त्याचे काहीच सोयरसुतक नाही. परिणामी कोरोनाकाळातही लाचखोर माणुसकी सोडून पैशांची सर्रास मागणी करीत आहेत. कोरोनापूर्वी जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या कारवायांत घट दिसून येत असली तरीही सन २०२१ मधील सहा महिन्यांत सहा कारवाया करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, कारवायांत घट असली तरी लाचखोरी मात्र थांबली नसल्याचे दिसत आहे.

-------------------------------

वर्ष लाच प्रकरणे (ग्राफ)

२०१६ २६

२०१७ १६

२०१८ २५

२०१९ २२

२०२० १६

२०२१ (जुलैपर्यंत) ०६

-----------------------------

ग्रामविकास विभाग सर्वांत पुढे

- जिल्ह्यात ग्रामविकास विभाग (जिल्हा परिषद-पंचायत समिती) सन २०१६ मध्ये बघितल्यास विभागाने पाच कारवायांत सहा लाचखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

- सन २०१८ मध्ये ग्रामविकास विभागात सर्वाधिक आठ कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्या असून, यामध्ये नऊ लाचखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

- सन २०२१ मध्ये जुलैपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण सहा कारवाया केल्या आहेत. मात्र त्यात एक कारवाई ग्रामविकास विभागात असून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------

लाच दोनशेपासून दोन लाखांपर्यंत !

घरकुलसाठी २०० रुपयांची लाच

जिल्ह्यात सन २०१८ मध्ये ग्राम रोजगार सेवकाने एकाला घरकुल मंजूर करवून देण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली होती. ते जिल्ह्यातील सर्वांत कमी रकमेचे लाचेची मागणी करण्याचे प्रकरण आहे.

---------

रेतीघाटांवर धाड न घालण्यासाठी दोन लाखांची लाच

सन २०१६ मध्ये जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याने रेतीघाटांवर कारवाई न करण्यासाठी येथील रेती व्यावसायिकांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. ही जिल्ह्यातील सर्वांत जास्त रकमेची मागणी होती.

------------------------------------

न घाबरता पुढे या...

काम करून देण्यासाठी सर्वत्र लाचेची मागणी केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. पैशांची मागणी करणे बेकायदेशीर असून, कुणीही पैशांची मागणी केल्यास न घाबरता पुढे यावे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी तत्पर आहे.

- रमाकांत कोकाटे

निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Web Title: Reduction in actions; But bribery will not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.