घाट लिलाव न होताच ३० लाखांचा दंड वसूल
By Admin | Updated: March 27, 2017 00:57 IST2017-03-27T00:57:49+5:302017-03-27T00:57:49+5:30
तालुक्यात ननसरी, मानेकसा व घाटटेमनी या तिन्ही घाटाचे लिलाव अद्याप झाले नसताना...

घाट लिलाव न होताच ३० लाखांचा दंड वसूल
गौण खनीज चोरीची २८४ प्र्रकरणे : शासनाला दिला ३ कोटी ७० लाखांचा महसूल
आमगाव : तालुक्यात ननसरी, मानेकसा व घाटटेमनी या तिन्ही घाटाचे लिलाव अद्याप झाले नसताना ही आमगाव येथे तहसीलदार साहेबराव राठौड व त्याच्या चमूने १ एप्रिल ते २४ मार्च दरम्यान २८४ प्रकरणे अवैध गौण खनिज चोरीचे प्रकरणे दाखल करून त्याच्या जवळून ३० लाख रुपये दंड वसूल केला आहे.
एप्रिल महिन्यात ८७ हजार ३०० रुपये, मे महिन्यात १ लाख ३५ हजार ६०० रुपये, जून महिन्यात १ लाख ७४ हजार १२० रुपये, जुलै महिन्यात १ लाख ९२ हजार ४०० रुपये, आॅगस्ट महिन्यात २ लाख ५१ हजार ८०० रुपये, सप्टेंबर १ लाख ७७ हजार ४०० रुपये, आॅक्टोबर १ लाख ९५ हजार ६०० रुपये, नोव्हेंबर ८९ हजार २३५ रुपये, डिसेंबर २ लाख ७८ हजार ५७८ रुपये, जानेवारी महिन्यात ५ लाख ८६ हजार ९२३ रुपये, फेब्रुवारी महिन्यात ५ लाख ९६ हजार ८४० रुपये तर मार्च महिन्याच्या २४ तारखेपर्यंत २ लाख ६७ हजार ८०४ रुपये दंड वसूल केला आहे. अवैध रेती, मुरुम, माती चोरुन नेणाऱ्या ट्रॅक्टर चालकांकडून सदर रक्कम वसूल करण्यात आली आहे. तिन्ही घाट लिलाव न होताच ट्रॅक्टर चालकांनी रेती चोरीचा सपाटा सुरु केला होता. त्यामुळे तहसीलदार साहेबराव राठौड, नायब तहसीलदार वाघचौरे, मंडळ अधिकारी कोरे व कठाणे यांनी या रेती चोरांवर रात्री बेरात्री पाळत ठेऊन सदर दंड वसूल केला. ट्रॅक्टर चालक रात्रीबेरात्री नदीतील रेती काढून ती मोठ्या किंमतीत लोकांना विक्री करायचे. त्यांच्यावर तहसीलदार व त्यांच्या चमूने कडक कारवाई करण्याची धडक मोहीम चालविल्यामुळे आमगाव तालुक्यातून गौण खनिज चोरणाऱ्यांचे धाबे दणाणले. या कारवाईमुळे आमगाव तालुक्यातील रेती चोरीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला. आमगाव तालुक्यात आता रबी पिक असल्याने नदीतील पाण्याची पातळी वाढली परिणामी रेती चोरी थांबली. (तालुका प्रतिनिधी)
३ कोटी ७०
लाखांची वसुली
शासकीय वसूलीचे ९५.२२ टक्के ुउद्दिष्टये आमगाव तहसील कार्यालयाने २४ मार्च पर्यंत पूर्ण केले. ३१ मार्चपर्यंत शासनाने दिलेले सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण केले जाणार आहेत. सर्व साधारण जमीन महसूल, वाढीव जमीन महसूल, संकीर्ण जमिन महसूल, जिल्हा परिषद उपकर, ग्रामपंचायत उपकर, रोहयो उपकर, शैक्षणिक उपकर, अकृषक आकारणी, पोट हिस्सा फाळणी, अवैध गौण खनिज, वैध गौण खनिज, आरआरसी करमणूक कर, हॉटेल परवाना फी अशा विविध बाबीमधून ३ कोटी ८६ लाख रुपये वसूल करण्याचे टार्गेट होते. यात ३ कोटी ७० लाख वसूल करण्यात आले.